मुंबई – शिवसेना नाव वापरण्यास मनाई आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालय ते निवडणूक आयोग असा प्रवास लांबल्यानंतर अखेर आज बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले असून शिवसनेच्या दोन्ही गटांना आता स्वत:ची वेगळी ओळख अर्थात नाव मिळाले आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मान्य केले असून त्यांनी सूचवलेले मशाल चिन्ह त्यांना देण्यात आले आहे. तर त्यांचा विरोधी गट असलेल्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे.
यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’बाळासाहेबांची शिवसेना’ नाव एकनाथ शिंदें गटाला देऊन, ४० आमदार आणि १२ खासदारांच्या भावनेची आयोगाने कदर केली.’ असे ते म्हणाले.
शहाजी बापू पाटील पुढे म्हणाले की,’बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध केला. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर केलेल्या युतीने शिवसेनेत दरार निर्माण केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. प्रामाणिक आणि नैतिकतेने काम करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा हा विजय आहे.’असे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.