दोन वर्षांपुर्वी काबील आणि रईस या चित्रपटांच्या रिलिज डेटवरून झालेल्या वादामुळे एकमेकांपासून दुरावलेल्या ह्रितिक रोशन आणि फरहान अख्तर यांच्यातील वाद मिटला असल्याचे बोलले जात आहे. योगायोग म्हणजे दोघेही पुन्हा एकदा 2 ऑक्टोबर रोजी आमने-सामने येणार आहेत. या दिवशी एकीकडे ह्रितिकचा ‘वॉर’ रिलीज होणार आहे. तर, दुसरीकडे फरहानच्या बॅनरखाली बनलेला चित्रपट “साई रा नरसिम्हा रेड्डी’देखील प्रदर्शित होणार आहे.
फरहान अख्तर व ह्रितिक चांगले मित्र होते. दोघांनीही “लक्ष्य’, ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’मध्ये एकत्र कामदेखील केले आहे. ह्रितिकने आपला “काबिल’ फरहानच्या बॅनरखाली निर्मित “रईस’सोबत रिलिज केला तेव्हा दोघांच्या मैत्रीमध्ये विघ्न आले. फरहानने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलावी, असे ह्रितिक व त्याचे वडिल राकेश यांना वाटत होते, परंतु तसे झाले नाही.
“सूत्रांच्या मते, “फरहान आणि ह्रितिक बऱ्याच दिवसांपासून एकमेकांशी बोलले नाहीत. मात्र, नुकतेच फरहानने ह्रितिकचे “सुपर 30’च्या यशाबद्दल अभिनंदन केले होते. आता त्याने ह्रितिकचे नवीन गाणे “जय जय शिव शंकर’चेदेखील कौतुक केले आहे. अशा वेळी दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आल्याचे म्हणता येईल.