हिंजवडी (रमेश ससार) -जगभरातील मोठ्या आणि मोजक्या आयटी हब पैकी एक अशी ओळख निर्माण करणाऱ्या हिंजवडी आणि आसपासच्या परिसराला मुलभूत सुविधांसाठी बाराही महिने झुंझावे लागत आहे. हिंजवडी येथे आयटी हब स्थापन करण्याच्या योजनेत केंद्र व राज्य सरकार दोघेही सहभागी होते. येथे मोठ्या प्रमाणात मोकळी जागा देखील उपलब्ध होती. त्यामुळे येथे नियोजित विकास होणे आणि मुलभूत सुविधा पुरविणे आवश्यक होते. तसेच नियोजनबद्ध विकास करणे सोपेही होते. परंतु त्याकाळी दाखविण्यात आलेल्या दूरदृष्टी आणि नियोजनाच्या अभावाचा त्रास आता येथील स्थानिकांना व आयटीयन्सला तीव्रतेने जाणवू लागला आहे.
हिंजवडी व आसपासच्या गावांना पाणी पुरवठा, रस्ते, पादचारी मार्ग, सांडपाणी विल्हेवाट, उद्याने, सार्वजनिक वाहतूक, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचे प्रश्न दिवसेंदिवस भेडसावत आहेत. या समस्यांचा परिणाम हिंजवडी भागात राहणा-या नागरिकांसह स्थानिक व्यावसायिक, वाहतूक व्यवस्था, रुग्ण, वृद्ध, लहान मुले, पोलीस व वाहतूक विभागावर पडत आहे.
स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी
हिंजवडी व आसपासच्या गावांच्या समस्येच्या मुळाशी असलेले मुख्य कारण म्हणजे हा भाग महापालिका व ग्रामपंचायंतीमध्ये विखुरला गेला आहे. यामुळे या भागाची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. मुलभूत गरजांची देखील या भागात कमतरता भासत आहे. त्यामुळे स्थानिक नेते मंडळी हिंजवडी, मान, मारुंजी, नेरे या गावांची मिळून एक नगरपरिषद बनविण्याची मागणी होत आहे. तर काही वर्षांपूर्वी हिंजवडीला पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी होत होती.
पैशापेक्षा पाण्याचे एमटीएमच जास्त
हिंजवडीच्या जवळच असलेल्या मारुंजी, नेरे या गावांमध्ये आता आयटीयन्सचे वास्तव्य वाढत आहे. येथे पाण्याची समस्या एवढी तीव्र झाली आहे की येथे पैशांच्या एटीएमपेक्षा अधिक पाण्याचे एटीएम ठिकठिकाणी दिसून येतात. भरपूर पाऊस पडणाऱ्या या परिसरातील नागरिकांना पैसे टाकून पाणी घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरापासून काही किलोमीटरच्या अंतरावरच लहान-मोठी धरणे आहेत. परंतु या परिसराची तहान अजूनही प्रशासनाला भागविता आली नाही. यामुळे स्थानिकांनी मागण्या केल्या आहेत की, दररोज 135 लिटर पाणी प्रति व्यक्ती मिळावे. मोठ्या वसाहतींच्या भागात नवीन पाण्याच्या टाक्यांची उभारणी करावी.
रस्ते आणि पावसाळी पाण्याचा निचरा
नेहमीच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या हिंजवडी व आसपासच्या गावातील नागरिक दर्जेदार रस्त्यांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. त्याचप्रमाणे पावसाळी पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन अगदीच कुचकामी ठरल्याचे दर पावसाळ्यात दिसून येते. यावर्षी देखील अनेक रस्त्यावरुन एक ते दीड फूट पाण्याचे पाट वाहत होते. ज्यातून वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. रस्त्यांच्या बाजूने पादचारी मार्ग करावेत. तसेच एलईडी पथदिवे, दुभाजक, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल, गतिरोधक बनवावेत, अशा मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
पीएमपीएमएलच्या बसगाडयांची संख्या व वारंवारिता वाढवून मार्गाचे विस्तारीकरण करावे. फीडर मिनी बसेस सुरू कराव्यात. सार्वजनिक पार्किंग व्यवस्था सुरु करावी. ई-रिक्षा सुरु कराव्यात. शेअर सायकल व्यवस्था सुरु कराव्यात. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी अतिक्रमणे हटवून रस्त्यांचे रुंदीकरण करावे. मेट्रोपर्यंत पूरक वाहतूक व्यवस्था करावी. मेट्रो स्थानकांची मल्टी नोडल ट्रान्सपोर्ट हबच्या दृष्टीने उभारणी करावी. तसेच बहुमजली पर्किंग व्यवस्था, पार्किंगसाठी दैनिक आणि मासिक पासची व्यवस्था करावी. बस स्थानकांची निर्मिती. ई-रिक्षा, सायकल शेअरिंग, ई-मिनी बसेस आदीची व्यवस्था करण्याची ही मागणी करण्यात आली आहे.