आमदार राहुल कुल ः सरकारच्या निषेधार्थ दौंड तहसीलसमोर करणार आंदोलन
यवत -जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी (दि. 25) दौंड येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी शनिवारी (दि. 22) चौफुला (ता. दौंड) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. ऍसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला तरुणींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजप तीव्र निषेध करीत आहे. मंगळवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर, नामदेव ताकवणे, आनंद थोरात, महेश भागवत, राजाभाऊ तांबे, तालुकाध्यक्ष गणेश आखाडे, सुनील शर्मा, स्वप्नील शहा, फिरोज खान यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.