नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील भारत जोडो न्याय यात्रेचा कार्यक्रम इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना कळवला जाईल. तसेच घटक पक्षांच्या सहभागामुळे इंडिया आघाडी आणखी मजबूत होईल असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण आपल्याला अजून मिळालेले नाही असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. त्या पाश्र्वभूमीवर कॉंग्रेसने हा खुलासा केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, उत्तर प्रदेशातील भारत जोडो न्याय यात्रेचा तपशीलवार मार्ग आणि कार्यक्रम तयार केला जात आहे आणि एक-दोन दिवसांत तो अंतिम होईल. १६ फेब्रुवारीला दुपारी ही यात्रा यूपीमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. यात्रेचे निमंत्रण नसल्याचे कारण देत ममता बॅनर्जी या यात्रेपासून दूर राहिल्या होत्या.
सध्या ही यात्रा सध्या झारखंडमध्ये असून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी यात्रेत सहभाग घेतला. झारखंड मुक्ती मोर्चा हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे.