पिंपरी – मागील लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. यामुळे माझ्या विजयात भाजपचा मोठा वाटा होता. भविष्याचा विचार करून मी शिंदे गटात सहभागी झालो, असे मत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
दै. “प्रभात’च्या कार्यालयातील गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना बारणे म्हणाले, “”शिंदे यांच्या बंडानंतर तीन वेळा उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. त्यांच्या आदेशानुसार राज्याचा दौरा केला. त्यावेळी प्रत्येक शिवसैनिकाचे हेच मत होते की राष्ट्रवादी सोबत सरकार नको. आपण सरकारमध्ये असूनही काम होत नाहीत. त्यामुळे भविष्याचा विचार करून शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांना विचारून घेतला.
पहिल्या पाच वर्षात भाजप शिवसेना युतीत काम करीत असताना केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असे. त्यानंतर शिवसेना महाविकास आघाडीत गेल्यावर कामांसाठी सहकार्य मिळत नव्हते. वेगळा गट केला असला तरी आम्ही आजही लोकसभेत शिवसेनेचे खासदार म्हणून आहोत. महागाईच्या संकटातून जनतेला मुक्त करावे, असे साकडे आपण गणरायाला घातले असल्याचेही बारणे म्हणाले.
आगामी निवडणुका भाजपासोबतच
आगामी कोणत्याही निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत आणि भाजपसोबत आमची युती आहे. शिंदे आणि भाजपचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य राहील. मग चिन्ह कोणतेही असो. आगामी मनपा निवडणूक आम्ही भाजप सोबत लढविणार आहोत. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागल्याने आता शिवसेनेचे कोणतेही नगरसेवक राहिले नाहीत. ते माजी नगरसेवक झाले आहेत. बहुतेक माजी नगरसेवक आमच्यासोबत येतील.