संगमनेर – करोना संकटाच्या नावाखाली घरात बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यामुळेच निळवंडेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस विलंब झाला. पण जे महाविकास आघाडीला जमले नाही, ते शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेऊन करून दाखवल्याचे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश कानवडे यांनी केले.
कानवडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, वर्षानुवर्षे निळवंडे कालव्यांच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या तालुक्यातील पुढाऱ्यांनी आता सल्ले देण्याचे काम करू नये. असे स्पष्ट करून राज्यात यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अकोले तालुक्यात मुखापासून पहिल्या 20 किमी अंतरावरील रखडलेल्या कालव्यांच्या कामातील अडथळे दूर करून या कामाला गती दिली. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने कालव्यांच्या कामाला गती मिळाल्याकडे कानवडे यांनी लक्ष वेधले. पालकमंत्री विखे पाटील यांनी या प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाठपुरावा केला. शिंदे-फडणवीस सरकारने या कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देऊन लाभार्थींना दिलासा दिल्याचे कानवडे म्हणाले.
युती सरकारने केलेल्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आ. बाळासाहेब थोरात यांनी करू नये. सर्व काही मी केले आणि माझ्यामुळेच झाले असा भ्रम निर्माण करणाऱ्यांनी निळवंडेच्या नावाखाली कशा सोयीस्कर भूमिका बजावल्या हे जनता जाणून आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.