बीसीसीआयकडून अधिकृत शिक्कामोर्तब
मुंबई-आयपीएल स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक असलेल्या व्हिवो या चिनी कंपनीशी असलेला करार मोडल्याचे बीसीसीआयने अधिकृतपणे सांगितले आहे. अर्थात, हा करार केवळ यंदाच्या वर्षासाठीच संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत असून पुढील काळात भारत व चीन यांच्यातील तणाव दूर होऊन संबंधात सुधारणा झाली तर भविष्यात पुन्हा व्हिवोशी करार केला जाऊ शकतो, असेही संकेत मिळाले आहेत.
करोनाच्या संकटामुळे पुढे गेलेली ही स्पर्धा आता येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अमिरातीत रंगणार आहे. लडाखमधील चीनची घुसखोरी तसेच करोना विषाणूंच्या फैलावाला चीनच कारणीभूत असल्याचे आरोप झाल्यामुळे भारतात चीनबाबतचा असंतोष दिवसागणिक वाढत आहे. त्यातच व्हिवो या चीनच्याच कंपनीशी बीसीसीआयचा करार असल्याने हा करार बासनात गुंडाळावा यासाठी बीसीसीआयवर दबाव वाढत होता. अखेर देशवासीयांच्या भावनेचा मान ठेवून हा करार संपुष्टात आणण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. या कारारानुसार बीसीसीआयला एकूण 2 हजार 199 कोटी रुपये मिळणार होते. दरवर्षी 440 कोटी रुपये या कंपनीकडून बीसीसीआयला प्राप्त होत होते.