5 कोटी 70 लाख निधीचे वितरण – आमदार अशोक पवार
न्हावरे – शिरूर तालुक्यात ऑक्टोबर 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 15 हजार 28 शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 5 कोटी 70 लाख 73 हजार 648 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.
न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी (दि. 7) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे धनादेश प्रातिनिधिक स्वरुपात आमदार पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव, तालुका कृषी अधिकारी सतीश केळगंद्रे, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सागर निंबाळकर, श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह मोकाशी, घोडगंगाचे संचालक बिरदेव शेंडगे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, मंडलाधिकारी मनिषा खैरे, कैलास सात्रस, डी. ई. हिरवे, सुनील नाईक, तलाठी माधव बिराजदार, सरपंच कैलास कोल्हे, तुकाराम मचाले, गोरक्ष तांबे, तात्याबा शेंडगे, शिवाजी घोलप, बाळासाहेब वाघचौरे उपस्थित होते.
शिरूर तालुक्यात ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 104 गावांतील 6 हजार 981 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. यात फळझाडांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये तर इतर पिकांसाठी प्रतिहेक्टरी 8 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. करोनाची परिस्थिती विचारात घेता नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.