मुंबईः कोरोना व्हायरस सर्व देशभर कहर करत आहे. दरम्यान सावधगिरी बाळगण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता 14 दिवस क्वारंटाइन आवश्यक करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने असा निर्णय घेतला आहे.
मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल. आणि प्रोटोकॉलनुसार त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावं लागेल. मुंबईत दाखल झाल्यानंतर काही शासकीय अधिकारी ओळखपत्र दाखवून क्वारंटाइनमधून सुटका मिळवत आहेत.
यापुढे ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामासाठी बाहेर पडायचं असेल, तर त्यांनी परवानगी घ्यावी. दोन दिवस अगोदर तशी विनंती महापालिकेकडे करावी लागणार आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्यावरून बिहार पोलिसांनी महापालिकेवर आरोप केले होते. या प्रकरणानंतर महापालिकेनं कडक भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.