मुंबई : ‘ज्या दिवशी मी अंगावर खाकी वर्दी चढवेल ना, त्या दिवशी माझी मरणाची भीती संपेल. महाराष्ट्र पोलीस हा धर्म आणि जात फक्त खाकी…’ हे एका ध्यास घेऊन जगणाऱ्या लेकीचे स्टेट्स आहे. जे तिने आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पूर्ण केलं आहे. तेही पहिल्याच प्रयत्नात. बिकट परिस्थितीवर मात करत केवळ मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर लावण्या जक्कन या तरुणीने PSI पडला गवसणी घातली आहे. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल तब्बल साडेतीन वर्षाच्या कालावधीनंतर जाहीर झाला आणि त्यात लावण्याने बाजी मारली. एवढंच नाही तर लावण्या जक्कन ही त्यांच्या कुटुंबात ग्रॅज्युएट होणारी पहिली मुलगी आहे.
लावण्या देविदास जक्कन ही नगर शहरातील तोफखाना परिसरात राहते. लावण्याचे वडील मागील ३० वर्षांपासून सायकल रिपेअरिंगचे काम करत होते. मात्र काही काळा पूर्वी त्यांचा अपघात झाल्यामुळे ते आता गोळ्या बिस्कीटांची टपरी चालवतात. लावण्याची आई ही लावण्या आणि तिचा भाऊ लहान असतानाच आजारपणामुळे घर सोडून माहेरी गेल्या. त्यावेळी लावण्या केवळ ५ वर्षांची होती. लावण्याचे प्राथमिक शिक्षण सीताराम सारडा विद्यालयात झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण न्यू आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालायात झाले.
आपल्या अवतीभवती अनेक मुली ती पोलीस दलात पाहत होती. आपल्याला पण खाकी वर्दी मिळायला पाहिजे, आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे म्हणून तिने स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास सुरु केला आणि पहिल्याच प्रयत्नात ती पोलिस उपनिरीक्षक झाली. तिच्या शिक्षणात तिच्या आजी आजोबांचा सिंहाचा वाटा असल्याचे ती आवर्जून सांगते. तिच्या आजीचे विड्या बनवण्याचे काम करून तिच्या शिक्षणाला हातभार लावला. आजोबांनी नेहमी प्रोत्साहन दिले. कुटुंबात एकच मुलगी शिकलेली होती ती म्हणजे लहान आत्या. त्यांचे नेहमी मार्गदर्शन लावण्याला लाभले. एकत्र कुटुंब असल्यामुळे वडापावची गाडी चालवून लावण्याचे चुलते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
शाळेत फार हुशार नसणाऱ्या लावण्याला सुरुवातीला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अवघड गेला. पण तिचे ध्येय वर्दीचे होते आणि आपल्याला कोणी कमी लेखले नाही पाहिजे म्हणून तिने हार न मानता जिवाचे रान करून अभ्यास केला. तिला मित्र-मंडळीचे आणि योग्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. १४ ते १५ तास लावण्या अभ्यास करत होती. घरातली थोडफार काम आवरून ती अभ्यासाला बसायची. यात तिने यूट्यूबची मदत घेतली. प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर ती पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिने हे यश संपादन केल्याने तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.