अहमदाबाद: अतिभयंकर “महा’ चक्रिवादळ 6 नोव्हेंबरच्या रात्री द्वारका ते दीव दरम्यान गुजरात किनाऱ्यावर थडकण्याची शक्यता आहे. त्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामन विभागाने रविवारी दिला आहे. किनारपट्टीवर थडकण्यापूर्वीच्या सहा तासांत हे चक्रीवादळ अत्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
हे चक्रीवादळ दीवपासून 580 किलोमीटर आणि वेरावळच्या 550 कि.मी. नैऋत्येकडे आहे. बुधवारी रात्री किंवा गुरुवारी पहाटे या वादळाची तीव्रता वाढेल आणि द्वारका ते दीव दरम्यान किनारपट्टीवर थडकण्याची शक्यता आहे. य दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर इतका असेल, असे “आयएमडी’चे संचालक जयंत सरकार यांनी म्हटले आहे.
वादळामुळे 6 ते 7 नोव्हेंबर रोजी सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडेल. हे चक्रिवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे परंतु सोमवारी गुजरात किनाऱ्याकडे परत येईल, अशी माहिती सरकार यांनी दिली.
सौराष्ट्रातील बंदरांना धोकादायक सिग्नल क्रमांक दोन फडकायला सांगण्यात आले असून जहाजांना चेतावणी देण्यात आली आहे. मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.