सरकारने कर्जमाफीसह वीजबिल सवलत द्यावी : राष्ट्रवादीची मागणी
मंचर – शेतकऱ्यांना शासनाने वीजबिल सवलत आणि कर्जमाफी देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी करणारे निवेदन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथे उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सुभाषराव मोरमारे, राजेंद्र गावडे, नंदकुमार सोनावले, दत्ताशेठ थोरात, प्रकाश घोलप, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रमेश खिलारी, युवक अध्यक्ष निलेश थोरात, दिनेश खेडकर, जनाबाई उगले, संदिप गायकवाड, दशरथ फंड, दत्तात्रय कदम, संतोष सैद, बाळासाहेब पोखरकर आदी मान्यवर निवेदन देतेवेळी उपस्थित होते.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरांचे, शेतीचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी पुर्णत शेती व्यवसायावर अवलंबून असून काढणीला आलेली पिके अतिवृष्टीमुळे खराब होऊन वाया गेली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भागातील भात, नाचणी, हिरडा पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच बाजरी, द्राक्ष, भुईमूग आणि तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने काही शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून गेली आहे. तर काही ठिकाणी रस्ते, पुल वाहून गेले आहेत. रस्त्यांची अवस्थाही अत्यंत खराब झाली असून रस्ते खड्डेमय झाले आहेत.
विजेचे खांब अनेक ठिकाणी पडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठाही वारंवार खंडीत होत आहे. महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यकारी करण्यात यावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिल सवलत देण्याबाबत, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. तसेच रस्ते, पुल दुरुस्तीसाठी आणि वीजेच्या देखभालीसाठी संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात यावेत. इत्यादी मागण्यांचे निवेदन
देण्यात आले.