नांदेड – ज्या साहित्यकृतीला उपयोजित मूल्य असते तीच साहित्यकृती सर्वश्रेष्ठ असते. नेपाळ एक देवभूमी हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन नाही, तर उपयोजित मूल्य असलेलं मानवी जीवनाच्या कल्याणाचं पसायदान आहे. भारत आणि नेपाळ या दोन राष्ट्रातील संस्कृतीचा अनुबंध चित्रीत करणारी ही कलाकृती होय, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी केले. ते नांदेड येथील नियोजन भवनाच्या सभागृहात संपन्न झालेल्या मंगला फुलारी लिखित नेपाळ एक देवभूमी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. हे पुस्तक भारताच्या सांस्कृतिक संचिताचे प्रतीक असून लेखिकेच्या पारदर्शी मनोवृत्तीचे प्रतिबिंब यात प्रगट झालेले आहे, असेही नांदेडे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर महापौर जयश्री पावडे, प्रभाकर कानडखेडकर, शिक्षण विस्तार अधिकारी तथा साहित्यिक व्यंकटेश चौधरी, प्रकाशक पांडुरंग पुठ्ठेवाड आणि लेखिका मंगला फुलारी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या सत्कारानंतर दीपाली शिराळे यांनी स्वागतगीत म्हटले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. प्राची पाटील यांनी नेपाळ एक देवभूमी या पुस्तकाची निर्मिती आणि लेखिकेने केलेला संघर्ष सांगितला. यावेळी लेखिका मंगला फुलारी यांनी आपल्या लेखनामागची भूमिका विषद केली. यावेळी बोलताना व्यंकटेश चौधरी म्हणाले, लेखिकेने या पुस्तकात नेपाळच्या भूमीला साक्षात करणारे चिंतन मांडले असून वाचकांना नेपाळ भेटीची उत्सुकता निर्माण करणारे हे पुस्तक झाले असून धक्कातंत्र देणारी लेखनशैली या हे या प्रवासवर्णनाचे वैशिष्ट्य आहे. सीमा प्रणव फुलारी यांनी मान्यवरांचे संदेश वाचून दाखवले.
यावेळी बोलताना महापौर जयश्री पावडे म्हणाल्या, प्रस्तुत प्रवासवर्णन नेपाळच्या सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैविध्याचे चलचित्र झाले आहे. साहित्यिकांच्या लेखणीतून समाजपरिवर्तन घडत असते. लेखिका ज्ञानदानाचे पवित्र कार्य निष्ठेने करून सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि सेवानिवृत्तीनंतर ते आता समाजशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. यामुळेच त्यांचे कौतुक वाटते. साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर म्हणाले, प्रवासवर्णनामध्ये मैलाचे दगड ठरलेल्या लेखनाची आठवण करून देणारे हे पुस्तक झाले आहे. अतिशय सहज, सोपे, प्रवाही असे हे पुस्तक वाचून परत एकदा नेपाळला भेट द्यावी, अशी इच्छा निर्माण होते. यावेळी गणेश शिंदे यांनी संपादित केलेल्या युवाराज्य या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशन सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन प्रा. धाराशिव शिराळे यांनी केले तर आभार प्रणव फुलारी यांनी मानले. यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण, संपादक शंतनु डोईफोडे, आशा पैठणे, वसंत मैय्या, बापू दासरी, शिवाजी कपाळे, दत्ता डांगे, शंकर वाडेवाले, दिगंबर कदम, महेश मोरे, ॲड. विजय भोपी, डॉ. संभाजी पाटील, सुवर्णा कळसे, स्वाती कान्हेगावकर, शिवा कांबळे, डॉ. विलास ढवळे, अनिता दाने, डॉ. अजय क्षीरसागर, अर्चना क्षीरसागर आदी मान्यवरांसह नांदेडमधील निवडक रसिक उपस्थित होते.