– कल्याणी फडके
पुणे – करोनामुळे मागील दीड वर्षांपासून सुरू असणाऱ्या ऑनलाइन शाळांमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, शैक्षणिक गुणवत्ता, सवयी या बाबींबरोबरच हस्ताक्षरावर मोठ्या प्रमाणावर आहे. मुलांचे हस्ताक्षर सुधारणे आणि त्यांना लेखनासाठी प्रवृत्त करणे पालकांसाठीच आव्हानात्मक ठरत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालकांनाच मुलांकडून प्रयत्न करुन घेण्याची गरज अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे.
ऑनलाइन शाळांमुळे गृहपाठ करणे, शुद्धलेखन करण्यासह विद्यार्थ्यांच्या लिखाणावर परिणाम झाला आहे. ऑनलाइन शाळांमुळे एका ठिकाणी योग्य पद्धतीत बसून लिखाण पद्धतीचा कंटाळा आता मुले करत आहेत. याचा थेट परिणाम हस्ताक्षरावर होत असून, “सुंदर अक्षर हाच खरा दागिना’ हे वाक्य आणि मुलांमधील अंतर दुरावत चालले आहे.
या सूचना महत्त्वाच्या
-
मुलांची भूमिती पक्की करुन घ्यावी.
-
अक्षरांची वळणे योग्य कशी असावी, हे पालकांनी कृती करुन दाखवावे.
-
पेन्सिलचा रंगीत भाग सुरू होतो. त्या ठिकाणी पकड असावी.
-
लिहिताना अधिक सरळ किंवा खाली वाकून बसू नये.
-
टेबल खुर्चीवर पाय तरंगते नसावेत.
“करोनाची सद्यस्थिती पाहता मुले पुन्हा केव्हा शाळेत जातील, याबाबत अंदाज बांधता नाही. त्यामुळे पालकांनीच मुलांमध्ये अक्षराबाबतची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी मुलांना सुंदर हस्ताक्षराची उदाहरणे दाखवावी. पालकांनी चांगल्या हस्ताक्षरासाठी मुलभूत गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. यामध्ये मुलांचे अक्षर, शुद्धलेखन आणि लिखाणाचा वेग या बाबींचा समावेश आहे. पालकांनी त्यांच्या कलेने घेणे आवश्यक आहे. “अ’ म्हणजे नाही आणि “क्षर’ म्हणजे नष्ट होणे. ज्या गोष्टीचा नाश होत ते “अक्षर’. इतका सुंदर ज्याचा अर्थ आहे, ते अक्षर चांगले का नसावे आणि माझे अक्षर चांगले आहे का, असा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा. विद्यार्थ्यांचे अक्षरच नीट नसेल, तर शुद्धलेखन आणि पेपर प्रेझेंटेशन हे भाग दुरावले जात आहेत,’ असे सुलेखन तज्ज्ञ शैलेश जोशी यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.