कराड – दि कराड आर्किटेस्टस् ऍण्ड इंजिनिअर्स असोसिएशनने सामाजिक कामात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. कोणतेही क्षेत्र असले, तरी कामगार नसतील, तर काही उपयोग होणार नाही. यासाठी संघटनेतील सभासदांनी कामगारांना प्राधान्य द्यावे. आज प्रगत झालेल्या आपल्या देशाच्या विकासात कामगार, अभियंते व आर्किटेक्ट यांचे मोठे योगदान आहे, असे मत राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केले.
दि कराड आर्किटेक्टस् ऍण्ड इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या यांच्या स्मरणार्थ 56 व्या अभियंता दिनानिमित्त यावर्षीचा सर विश्वेश्वरैय्या पुरस्कार केसे, ता. कराड येथील निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब पांडुरंग शिंदे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के. सुरवसे, असोसिएशनचे अध्यक्ष महेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री खाडे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपल्याला मिळालेल्या घासातील घास गरिबाला दिल्यास आयुष्यभर काही कमी पडणार नाही. करोना काळात इंजिनिअर्स असोसिएशनने कामगारांसह गोरगरीब लोकांसाठी काम केले. इतर सामाजिक कार्यातही ते योगदान देत आहे. या संघटनेत इंजिनियर्स व आर्किटेक्ट एकत्र काम करत असून संघटनेची आणखी प्रगती होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, केसे सारख्या छोट्या गावात जन्माला आलेले आबासाहेब शिंदे यांना गौरवण्यात आले, याचा आनंद आहे. पक्ष, विचार वेगळा असला तरी विकासासाठी एकत्र आले पाहिजे. सत्काराला उत्तर देताना आबासाहेब शिंदे यांनी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. असोसिएशनचे अध्यक्ष महेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. उपाध्यक्ष दिग्विजय जानुगडे यांनी सत्कारमूर्ती आबासाहेब शिंदे यांचा जीवन परिचय करून दिला. मानपत्र वाचन मनाली कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष दिग्विजय जानुगडे, खजिनदार चंद्रकांत पोळ, सेक्रेटरी अमित उंब्रजकर, संचालक किशोर साळुंखे, मिलींद पाटील, मकरंद जाखलेकर, राजेंद्र जाधव, प्रतीक जाधव, धैर्यशील यादव, रोहित शर्मा, क्षितीज बेलापुरे, अजिंक्य पाटील, अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते उपस्थित होते.