पुणे – शहरात पाऊस थांबल्यानंतर रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याची घोषणा प्रशासनाने केली. त्यानंतर रस्त्यावर खड्डे आढळल्यास दि. 9 ऑगस्टनंतर अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याचा इशाराही दिला. मात्र, त्यानंतर गेल्या आठ दिवसांत सलग जोडून शासकीय सुट्टया आल्याने महापालिकेची यंत्रणा सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे रस्ते दुरूस्तही नाही आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही.
दरम्यान, जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डे असताना प्रशासनाकडून रस्त्यांची जबाबदारी असलेल्या 127 अभियंत्यांपैकी केवळ 4 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खड्डे बुजविण्याच्या कामाला गती येणे आवश्यक होते. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी खड्डे कायम आहेत. दरम्यान, महापालिकेचे मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रस्त्यांची विभागनी केल्याने कोणता रस्ता कोणी दुरूस्त करायचा यावरून प्रशासनातही एकमत नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे.