सातारा – किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगाम अद्याप सुरु झाला नाही. कारखाना मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कर्मचारी कित्येक महिने पगाराविना आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत हा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी जे जे शक्य आहे ते करण्याची तयारी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्हा कॉंग्रेस कमिटीत कारखान्याबाबत जोरदार खलबते झाली.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंबंधी जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालयामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याबाबत चाचपणी करण्यासंबंधी व कार्यकर्त्यांची मते आजमावण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोरेगाव, वाई, खंडाळा, सातारा व जावळी तालुक्यातील कॉंग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ही निवडणूक कशा पद्धतीने कारायची किंवा यासंदर्भात रचना कशी असावी याबाबत कार्यकर्त्यांनी मते व्यक्त केली.
ही निवडणूक कॉंग्रेस पक्षाने स्वतःच्या ताकदीवर स्वतंत्र पॅनेल टाकून लढावी, असे मत बहुतांश कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. साखर कारखान्याचे बहुतांश सभासद कॉंग्रेसच्या विचारसरणीचे आहेत. सद्यस्थितीमध्ये पाचही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला वेळेत न गेल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने पुढाकार घ्यावा. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात आली आहेत. यावेळी पाचही तालुक्यामधील 50 ते 60 सभासद उपस्थित होते.
कारखाना वाचला पाहिजे हीच भावना
किसन वीर कारखाना वाचला पाहिजे. हा कारखाना सभासदांचा राहिला पाहिजे, शेतकऱ्यांचा ऊस सहकारी साखर कारखान्याकडे गळितास गेला पाहिजे. केवळ आणि केवळ याच भावनेतून या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. कॉंग्रेसने महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ वाढीस घातली असून ती मोडीत काढण्याचा डाव काही प्रस्थापित लोक करत आहेत. ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी व सहकारामध्ये लावलेले रोपटे जिवंत ठेवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीचे आणि किसन वीरच्या सभासदांचे आद्य कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवून राजकारण न बघता शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, अशी सर्वसमावेशक चर्चा यावेळी करण्यात आली.