पुणे – करोनाचे संकट दूर करणे ही सामूहिक जबाबदारी असून शासकीय यंत्रणांनी त्यासाठी कसून प्रयत्न करावेत, असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. करोनाच्या संकटाशी लढताना आर्थिक अडचणी किंवा मनुष्यबळाच्या अडचणी असतील तर त्याबाबत स्पष्टपणे सूचना करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी आज विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्ये बैठक घेतली. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आयुक्त शेखर गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांचा आढावा घेतला. परराज्यातील मजुरांना परत पाठविण्यासाठी राज्यनिहाय समन्वय अधिकारी नेमण्यात येणार आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
सोमवारपासून बाजार समित्या सुरू
करोनाशी मुकाबला करताना मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यासाठी दोन्ही महानगरपालिका यांनी दक्षता घ्यावी. खरीप हंगाम सुरू होत असून, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यांचा तुटवडा भासता कामा नये. तर सोमवारपासून बाजार समित्या सुरू करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनावर नियंत्रण मिळवले असल्याने तेथे अटी-शर्तींच्या अधीन राहून उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कामगार किंवा मजुरांची वाहतूक, त्यांची निवास व्यवस्था, मास्कचा वापर याबाबत आवश्यक ते निर्देश देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.