पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी नागरिकांच्या दारात बॅंड वाजविला जात असून, मिळकतींची जप्तीही केली जात आहे. समाविष्ट गावांप्रमाणे शहर परिसरातही थकबाकी वसुली थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने (ठाकरे) पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
मागील आठवड्यात ३४ गावांमधील लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी पवार यांची भेट घेत मिळकतकराबाबत गाऱ्हाणे मांडले होते. त्यावेळी पवार यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना आदेश देत समाविष्ट गावांमधील मिळकतकर वसुलीविषयी जप्तीची कारवाई थांबविण्याचे आदेश दिले.
आपण पालकमंत्री संपूर्ण पुणे शहर व जिल्ह्याचे आहात. या नात्याने पुणेकरांना पण मिळकतकर कारवाईमधे सहकार्य करावे, पुणे शहरातील मिळकतकर थकबाकीदारांवरील कारवाई थांबवून समाविष्ट ३४ गावाप्रमाणे पुणेकरांना समान न्याय देण्यात यावा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
केवळ गावांसाठी असा निर्णय घेणे म्हणजे शहरातील नागरिकांना नैसर्गिक न्याय न देण्यासारखे असून एकाच विषयाचे दोन निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे आपण मिळकतकर वसुलीसंदर्भात घेतलेला निर्णय फक्त समाविष्ट ३४ गावांपुरता मर्यादित न ठेवता पुणे शहरासाठी अंमलबजावणी केल्यास ते योग्य व न्यायाचे होईल, अशी खोचक मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.