दिघी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथे लाखो रुपये खर्च करून भाजीमंडई उभारली आहे. परंतु इंद्रायणीनगरातील भाजी मंडईची दुरवस्था झाली आहे. या भाजीमंडईमध्ये सध्या भाजीविक्रेते बसत नाहीत. त्यांनी भाजीमंडईचे काम व्यवस्थित नसल्याचे कारण देत वाहनतळाच्या जागी भाजीमंडई भरत आहे. त्यामुळे या मोकळ्या भाजीमंडईमध्ये तळीरामांनी आपला अड्डा बनविला आहे.
भाजी मंडईत 72 भाजी विक्री आणि 18 फळ विक्रीचे स्टॉल्स आहेत. दीड वर्षांपूर्वी ही भाजी मंडई प्रत्यक्ष सुरू झाली. मात्र, या भाजी मंडईची रचना योग्य नसल्याचे कारण देत भाजी आणि फळे विक्रेत्यांनी भाजी मंडईच्या वाहनतळामध्येच दुकाने थाटली आहेत. मुख्य भाजी मंडई बंद असल्याने या भाजी मंडईचा ताबा टवाळखोर आणि तळीरामांकडे असतो. बर्याच वेळा दिवसाही येथे तळीरामांचा ठिय्या असतो.
सध्या भाजी मंडईमधील गाळ्यांची दुरवस्था झाली आहे. पाण्याच्या नळाच्या तोट्या गायब झाल्या आहेत. स्वच्छतागृहात पाण्याच्या अभावाने दुर्गंधी पसरली आहे. गुटखा खाऊन नागरिक सर्वत्र थुंकलेले आहेत. परिसरात कचर्याचे ढीग दिसून येत आहेत.
भाजी मंडईतील पार्किंगच्या जागेत भाजी-फळे विक्रेते बसत असल्याने भाजी मंडईत येणारे ग्राहक भाजी मंडईचे प्रवेशद्वार आणि रस्त्यावर वाहने लावतात. त्यामुळे, येथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील समस्या सोडवून भाजी मंडई त्या जागेत कशी भरेल याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे.