खालापूर, (वार्ताहर) – ताकई गावात अनेक गगनचुंबी इमारती उभ्यारल्या जात आहेत. तसेच काही इमारतींचे बांधकाम सुरू आहे. इमारतींमधील सांडपाण्यासाठी गटारांचे नियोजन केले नसल्याने इमारतींमधील सांडपाणी शेतांमध्ये सोडले जात आहे. परिणामी शेती जमिन नापीक होत आहे.
नगरपालिकेने सांडपाण्याचे नियोजन करावे, यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याला नगरपालिका दाद देत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेत मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्याशी बैठक भेट घेत ताकई रस्ता आणि सांडपाण्याची तातडीने उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी दिली आहे.
डॉ. सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ताकई गावातील ग्रामस्थांनी नगरपालिकेच्या कार्यालयावर धडक देत पंकज पाटील यांची भेट घेत बैठक घेतली. या बैठकीला माजी नरगसेवक अमोल जाधव, बोझर सोसायटीचे अध्यक्ष समीर देवकर, जयवंत पाटील, ॲड. काळूराम पाटील, हितेन पाटील, मंदार पाटील, दिनेश पाटील यांच्यासह ग्रामस्थउपस्थित होते.
ताकई गावात २ हजार फ्लँट बांधले जात आहेत. इमारतींमधील सांडपाण्याच्या गटारांचे नियोजन केले नसल्यामुळे सांडपाणी नाल्यातून शेतात सोडले जाते. शहरात भुयारी गटाराचे काम सुरू आहे. या योजनेत ताकई गावचे नाव नसल्याचे पाटील यांनी सांगितले. तर, त्यासाठी वनविभागाकडे नगरपालिका पाठपुरावा करीत असल्याचे बांधकाम अभियंता अनिल वाणी यांनी सांगितले.
ताकई रस्त्याच्या कामासाठी अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर ५ कोटी निधी उपलब्ध झाला आहे. क्राँक्रीटीकरणाचे अर्धवट काम पूर्ण करावे. तसेच सांडपाण्याचा नियोजन होत नाही, तोवर ताकई ग्रामस्थ आणि इमारतीमधील रहिवासी घरपट्टी भरणार नाहीत, असे डॉ. सुनिल पाटील यांनी सांगितले.
ताकई रस्त्याच्या क्राँकीटीकरणाचे काम वनविभागाचे आडवले आहे. वनविभागाकडे परवानगीसाठी पाठपुरावा करीत आहोत. तर, सांडपाण्याची समस्या सोडविण्यासाठी जेसीबीने चर काढून गटार करण्याचे आदेश दिले आहेत, असे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी सांगितले.