नवी दिल्ली : देशाची राजधानी पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराने हादरली आहे. दरम्यान मुलीचा बलात्कार करून हत्यादेखील करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद थेट संसदेत पडत असल्याचे दिसत आहे. त्यातच विरोधी पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
पीडिताच्या आईवडिलांनी आरोप केला की, माझ्या मुलीसोबत बलात्कार झाला आहे आणि एका पुजाऱ्याने खोटं बोलून तिचे अंत्यसंस्कार केले आहे. मुलीचा करंट लागून मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. मुलीच्या आईवडिलांसह अनेक लोकांनी काल या प्रकरणी घटनास्थळी धरणं आंदोलन केले. दोषींना मृत्यूदंड देण्याची मागणी केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी देखील आंदोलन केले आहे.
“घटनेच्या वेळी माझी मुलगी स्मशानात पाणी आणण्यासाठी गेली होती. पुजाऱ्याने मला काही क्षणांसाठी मुलीचा मृतदेह दाखवला. तिचे होठ निळे पडले होते. पुजाऱ्याने आमच्या मर्जीशिवाय मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मुलीला करंट लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पुजारी खोटं बोलत आहे. पुजाऱ्यानेच माझ्या मुलीवर बलात्कार केला” असा आरोप मुलीच्या आईने केला आहे.
आमच्या समाजाच्या काही माणसांनी पेटलेली चिता विझवली आणि माझ्या मुलीच्या पायाला पकडून तिचा मृतदेह बाहेर ओढला. आम्हाला न्याय हवा. दोषींना शिक्षा द्या. मुलीच्या वडिलांनी आरोप केलाय की, एका व्यक्तीने त्यांना बेदम मारलं आणि पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारेन असे धमकावले . घटनेच्या वेळी मी बाजारात होतो. मला संध्याकाळी ७.३० च्या सुमारास समजले. एका व्यक्तीने मला २० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले परंतु मी ते स्वीकारले नाही. पुजाऱ्याने त्या व्यक्तीला घटनेबद्दल सांगितले असावे असे पीडित मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केला.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पुजाऱ्यासह चौघांना अटक केली आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, कायद्याखाली दोषींवर कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.