(विवेकानंद काटमोरे, हडपसर/मांजरी)
मांजरी – खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरण गुरुवारी दुपारी १०० टक्के भरले. परिणामी या धरणातून मुठा नदीपात्रात १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीला पूर आला आहे.
या पूरामुळे मांजरी बुद्रुक व मांजरी खूर्द गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्हीही बाजूला बँरिकेडस लावून पूलावरील वाहतूक बंद केली आहे.
मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदीवर काही वर्षांपूर्वी सबमर्शिबल पूल बांधलेला आहे. क्षमता नसतानाही सध्या या पूलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. हा पूल नगर व सोलापूर महामार्गांना जोडणारा आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह इतर सर्वप्रकारची खासगी व सार्वजनिक वाहतूक येथून होत आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे व तुटलेले कठडे यामुळे वाहतूकीसाठी आगोदरच धोकादायक झालेला हा पूल पूरामुळे आणखीनच धोकादायक झाला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून पूलावरून पाणी वाहयला सुरुवात झाली. पूर पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांवर बघ्यांची गर्दी जमली होती. पाऊस सुरू राहिल्यास पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तखडकवासला धरणातून कदाचित पून्हा अधिक पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे पूराचा धोका आहे. प्रवाशांनी येथून प्रवास न करता वाघोली व थेऊर या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.