शिर्डी, प्रतिनिधी – जिल्ह्यात २०२२ ते २०२३ या कालावधीत झालेली अतिवृष्टी, सततचा पाऊस, गारपीट आणि अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी ६ लाख ५६ हजार ९५९ शेतकऱ्यांना सुमारे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे मदतरुपी अनुदान मंजूर झाले. मंजूर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे २ लाख ५५ हजार ६८ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यातून या शेतकऱ्यांना २९१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. याचदरम्यान अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून २ लाख ९२ हजार ७५० शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून २४१ कोटी रुपयांची मदत शासनाने दिली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
मार्च २०२३ मध्ये अवेळी पावसामुळे जिल्ह्यात ११ हजार ७९३ शेतकऱ्यांना शेतीपिकांचे नुकसान सहन करावे लागले. या शेतकऱ्यांना एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसानातील मदत म्हणून ४६ कोटी ९३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ऑक्टोंबर, नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई देखील महायुती सरकारने दिली. जिल्ह्यातील २७ हजार ५३० शेतकऱ्यांना १९ कोटी ५५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या वादळी वारे आणि गारपिटीतील शेतीपिकांच्या नुकसानीकरीता २१ हजार ६८३ शेतकऱ्यांना २८ कोटी ३७ लाख, जून २०२३ मध्ये वादळी वारे व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानी करीता ४६० शेतकऱ्यांना ४५ लाख आणि सप्टेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिक व शेतजमिनींच्या नुकसानीपोटी ९२ शेतकऱ्यांना २ लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली.
आत्तापर्यंत नैसर्गिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभे असून, जिल्ह्याला आत्तापर्यंत ६३७ कोटी ७८ लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली असून, पोर्टलवर परिपूर्ण माहिती असलेल्या शेतकऱ्यांना सदर मदत थेट त्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.