मुंबई : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाने राज्यभरात वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. मात्र, त्यावरून विरोधकांनी भाजपासह चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला.
संजय राऊतांनी, “ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतात, ज्या पक्षाचे प्रवक्ते शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असं म्हणतात, त्याच पक्षातला हा वंश आहे. हे अकलेचे कांदे आहेत सगळे. मग तुमच्या तिजोरीत येणारे पैसे पक्षाची भीक आहे असंच म्हटलं पाहिजे. तुम्ही जे खोके वाटले, तीही भीकच होती असं म्हटलं पाहिजे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.
“ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. एकेकाळी ज्योतिराव फुलेंचं उत्पन्न हे टाटांपेक्षा जास्त होतं. त्यांनी आपली सगळी संपत्ती दानधर्मात, शाळा-कॉलेज, दलितांसाठी वापरली. त्या काळात टाटांचं उत्पन्न २० हजार होतं, तेव्हा ज्योतिबा फुलेंचं उत्पन्न २१ हजार होतं. याची इतिहासात नोंद आहे, हे यांना माहिती नाही. त्यांना हे शब्द मागे घ्यावे लागतील आणि महाराष्ट्राची माफी मागावी लागेल”, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, पैठणमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी “कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत”, असे म्हटले होते.
त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर पाटील यांनी स्पष्टीकरणदेखील दिले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाही. त्यांनी लोकांकडून पैसे मागितले. आपण वर्गणी मागितली, सीएसआर मागितला असं आज म्हणतो. त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील घरोघरी फिरून धान्यही मागायचे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.