नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सतत वादात अडकणारे आणि भारताला हिंदुराष्ट्र बनवण्याचे स्वप्न बघणारे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी आशिया खंडातल्या लोकांमध्ये राम-कृष्णाचं रक्त आहे, त्यात पाकिस्तानचा देखील समावेश आहे असे म्हटले आहे.
एका कार्यक्रमा दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी, ‘पाकिस्तान हा भारताचा एक भाग होता. त्यांनी भारताला पाकिस्तानचा बाप म्हणत बाप आणि मुलगा भेटीसाठी तयार आहेत, असे विधान केले आहे. ‘पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र असलं तरी ते फक्त त्यांच्यापुरतं आहे. मुळात भारत आणि आशियामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हृदयावर दगड ठेवून खरं बोलला तर त्यांच्या धमण्यांमध्ये राम-कृष्णाचं रक्त वाहात आहे, हे सिद्ध होईल.’असे त्यांनी यावेळी म्हटले.
हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर धीरेंद्र शास्त्री यांनी यावेळी बोलताना, ‘हिंदुंनी हिंदू राष्ट्राची मागणी केली पाहिजे. याबाबत स्वतः हिंदूच निर्णय घेऊ शकतात. असे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र झालं पाहिजे’, असे विधान केले आहे. मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री चमत्कारांच्या दाव्यांवरुन चर्चेत आलेले आहेत. बागेश्वर बाबा हे मनातले ओळखतात आणि लोकांचे प्रश्न सोडवतात, या दाव्यावरुन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला होता.