स्वच्छतागृहात जाण्यासाठी रस्ताच नाही
संगमनेर (शहर प्रतिनिधी) – शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यातच आरोग्याचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. शहरात ठिकठिकाणी स्वच्छतागृहे आहेत. मात्र या स्वच्छतागृहात जाण्यासाठी मार्गच अस्तित्वात नसल्याने तेथे जायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
नवीननगर रस्ता म्हणजे शहरातील प्रचंड रहदारीने गजबजलेला परिसर. विविध रुग्णालये, बॅंका, सोन्या-चांदीच्या अलंकारांची दालने, वस्त्रालये, मोठ मोठी अस्थापनांची कार्यालये आणि त्यात मोठी भर घालणारे व सोळा कार्यालयांचा डोलारा सांभाळणारे प्रशासकीय भवन याच रस्त्यावर आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
बसस्थानकासमोरच म्हणजे नवीननगर रस्त्याच्या कोपऱ्यावर भिंतीवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचे चित्र लावण्यात आले आहे. त्याच्या पाठीमागे त्याच भिंतीला खेटून स्वच्छतागृह उभारण्यात आले असून, तेथे जाण्यासाठी मात्र अद्यापही रस्ताच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले आहे. सदरच्या स्वच्छतागृहात पाण्याचीही व्यवस्था असून, त्यासाठी स्वच्छतागृहावर छोटी पाण्याची टाकीही बसविण्यात आली आहे. मात्र तेथे जाण्यासाठीच मार्ग नसल्याने गेल्या महिन्याभरापासून सदरचे स्वच्छतागृह वापराशिवाय उभे आहे. संबंधित ठेकेदाराने आपली भूमिका बजावून पैसे घेतले आहेत. मात्र त्यामागील उद्देशाशी कोणालाही सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे.
आपले हितसंबंध सांभाळण्यासाठी सर्वसामान्यांच्या सुविधांकडे डोळेझाक करुन शहरातील जुनी स्वच्छतागृहे बंद करण्यात आली. त्यानंतर नागरिकांतून रोष व्यक्त होऊ लागताच नवी स्वच्छतागृहे तयार करण्याचा व ठेकेदार पोसण्याचा घाट घालण्यात आला. त्यातूनच शहरात सात ठिकाणी प्लॅस्टिकची स्वच्छतागृहे बसविण्यात आली. मात्र स्वच्छतागृह कोठे बसवावे, नेमकी गरज कोठे आहे, त्याचा शहराच्या सौंदर्यावर काय परिणाम होईल, अशा मूलभूत गोष्टींचा विचारही केला गेला नसल्याने हा उद्योग शहराच्या सौंदर्यासाठी की ठेकेदारांना पोसण्यासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संगमनेरचे प्रवेशद्वार म्हणूनही बसस्थानक चौकाकडे पाहिले जाते. येथे महात्मा गांधींचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यामागेच स्वच्छतागृहही उभारण्यात आले आहे. एकाच जागेवर वारंवार बांधकामे करुन व नियोजनशून्य खर्च करुन पालिका आपल्या भोंगळ कारभाराचेच दर्शन
घडवित आहे.