नगर – नगर शहरासह उपनगरात रस्ते आहे की नाही अशी शंका व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षापासून दोन-पाच रस्ते नव्याने झाले आहेत. उर्वरित खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कळत नाही. अशी अवस्था असतांना पहिल्याच पावसात महापालिकेसह लोकप्रतिनिधींच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे.
शहरातील बहुतांशी रस्ते चिखलमय झाले असून त्यात गटारीचा मैला देखील रस्त्यावर आला आहे. त्यामुळे नगरकरांना या रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. विशेष म्हणजे देशात व राज्यात ज्यांची सत्ता आहे. त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगराध्यक्षांच्या घरासमोर अक्षरशः गटार गंगाच वाहत आहे. या रस्त्याने चालणे देखील अवघड झाले आहे.
रस्त्याची अवस्था तर दयनीय आहे. पण महापालिकेने पावसाळ्यापूर्वी गटारी, नाले, ओढ्याची वरवर केलेल्या साफसफाईचे पितळ मात्र या दोन दिवस झालेल्या पावसाने उघडे पाडले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे गटारीमधील पाणीही रस्त्यावर वाहू लागले असून गटारीची कचरा व मैला हा रस्त्यावर साठला आहे.
गौरीघुमटकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारीचा मैलासह चिखल रस्त्यावर साठल्याने या परिसरात मोठी दुर्गंधी सुटली असून पायी चालणे देखील अवघड झाले आहे. या परिसरात देशात व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे पदाधिकारी व माजी नगराध्यक्षा राहत आहे. त्यांच्या घरासमोरच जर ही अवस्था असले तर अन्य सर्वसमान्यांच्या घरासमोरचा विचार न केलेलाच बरा.
मध्यवर्ती शहरात ही अवस्था आहे तर उपनगरातील रस्त्याची काय अवस्था असेल याची कल्पनाच न करणे बरे राहिले. अधिक रस्ते खड्डेमय झालेले त्यात साफसफाई न झाल्याने तुंबलेल्या गटारीतील कचरा व मैला थेट रस्त्यावर येत आहे.
या दोन दिवसात झालेल्या पावसाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. नगरकर शोषित असल्याने ते बोलत नाही. त्यामुळे आजवर याचा फायदा राजकीय पक्षांच्या नेत्यासह लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.