सातारा -भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम असणाऱ्या नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली असून आदिशक्तीच्या स्वागताची तयारी सातारा शहरामध्ये पूर्ण झाली आहे. सातारा शहरातील सुमारे 90 हून अधिक सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी जाणवत असून उपवासाच्या साहित्य खरेदीसाठी सुद्धा वर्दळ वाढली आहे.
गरबा दांडिया इत्यादीच्या खरेदीसाठी आणि नवरंगाच्या विशेष आकर्षणातून कापड मार्केटमध्ये सुद्धा उलाढाल वाढल्याने व्यापारी वर्ग व्यस्त झाला आहे. देवी आदिशक्तीच्या जागराचे नऊ दिवस उत्साहाने आणि मांगल्याने भरलेले असतात. पितृ पंधरवड्यानंतर येणाऱ्या या सणाचे धार्मिक महात्म्य मोठे आहे.
मांगल्याचे प्रतिक असलेल्या नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत असून गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे हा सण म्हणावा इतका उत्साहाने साजरा झाला नव्हता. घटस्थापनेसाठी राजवाडा परिसरातील गोल बागेजवळ घटाची माती, घट, नाडापुडी इतर साहित्य खरेदीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यंदा करोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे नवरात्र उत्सवाचे उत्साही वातावरण मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
घरगुती आणि सार्वजनिक उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून देवींच्या उपासनांची पूर्वतयारी करण्यासाठी महिला वर्गाची धांदल उडाली आहे. सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळांनी मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आणली आहे. देवीची मूर्ती पारंपरिक पद्धतीने नेण्यासाठी गडकर आळी, कुंभार आळी कुंभारवाड्यामध्ये गर्दी सुरू झाली आहे. नऊ दिवस दुर्गामातेची नवरुपांमध्ये पूजा बांधली जाते. देवीला साडी चोळी, ओटी, खण नारळ, रांगोळी, वस्त्र यांसह पूजा साहित्य खरेदीसाठी गडबड वाढली आहे.
बाजारपेठेत वाढली वर्दळ
नऊ दिवसाचा रास, गरबा, दांडिया इत्यादीच्या खेळासाठी वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या बांधणीच्या साड्या हव्या असल्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर कापड बाजारात गर्दी करत आहे. घटस्थापनेसाठी मातीचे कलश, मिश्र धान्य, नाडापुडी साहित्य विक्रीची दुकाने शहरात ठिकठिकाणी दिसत आहेत. नवरात्र संवाद, नवरंगांचे महिला वर्गामध्ये विशेष आकर्षण आहे. नऊ दिवस नऊ रंगांच्या साडया परिधान केल्या जातात. त्यामुळे कापड दुकाने सज्ज झाली आहेत. नवरात्र सुरू होण्यापूर्वी नवरंगातील साड्या, ड्रेस खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. नऊ दिवस महिलांचे उपवास असल्याने खजूर, भाजणीचे पीठ, साबुदाणा, शेंगदाणे याशिवाय ड्रायफ्रूट इत्यादी फराळाच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नायलॉन चिवडा, वरई, वेफर्स, रेडिमेड पीठे इत्यादी साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. मात्र, यंदा जीवनावश्यक आणि खाद्यपदार्थांच्या वस्तूवर मोठ्या प्रमाणावर जीएसटीची सक्ती असल्याने सातारकरांचा खिसा थोडा जास्त हलका होणार आहे.