केंद्र सरकार साडेआठ लाख टन साठा उपलब्ध करणार
पुणे – डाळींचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. ते आणखी वाढू नये याकरिता केंद्र सरकारने जवळ जवळ साडे आठ लाख टन डाळींचा साठा खुल्या बाजारासाठी उपलब्ध करायचे ठरविले आहे. यामुळे डाळींचे दर स्थिर होतील, अशी अपेक्षा ग्राहक व्यवहार विभागाने व्यक्त केली आहे.
सध्या मोठ्या शहरांमध्ये डाळिंचे दर 60 ते 95 रुपये प्रतिकिलोदरम्यान आहेत. मात्र, उडीद डाळीचे दर 140 रुपयांपर्यंत वाढले आहेत. ते आणखी वाढू नये यासाठी या डाळींचा साठा खुला केला असल्याचे सांगण्यात आले. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांनी या संदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जी डाळ खुली करण्यात येणार आहे त्यामध्ये 3.2 लाख टन तूरडाळ, 2 लाख टन उडीदडाळ, 1.2 लाख टन हरभराडाळ, 1.5 लाख टन मूगडाळ आणि 57 हजार टन मसूर डाळीचा समावेश आहे.
या निर्णयाबाबत डाळी आणि धान्य संघटनेचे अध्यक्ष जितू भेंडा यांनी सांगितले, फक्त उडीद डाळीचे दर सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत.
बाकीच्या डाळींचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी पातळीवर आहेत. त्यामुळे उडीद वगळता इतर डाळींचा साठा खुला करण्याची गरज नाही.
वाटाण्याच्या आयातीवर निर्बंध
परदेशातील स्वस्त वाटाणा देशात येऊ नये याकरिता व्यापार महासंचालयाने आयातीसाठी किमान दर जाहीर केला आहे. यानुसार 200 रुपये प्रति किलोपेक्षा स्वस्त वाटाणा आयात करता येणार नाही. स्वस्त वाटाणा देशात येऊन देशातील वाटाण्याचे दर कमी होऊ नयेत यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.