मोहाली – ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला असून यजमान भारतासह तीन टी-20 सामन्यांची मालिका आजपासून येथे होत असलेल्या पहिल्या सामन्याने सुरू होत आहे. आशिया करंडक स्पर्धेत झालेल्या चुका दुरुस्त करत या मालिकेत सरस खेळ करण्याची संधी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंसह नवोदितांनाही मिळणार आहे.
आशिया करंडक स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघाने पाकिस्तान व हॉंगकॉंग यांचा पराभव करत सुपर फोर गटात प्रवेश केला होता. मात्र, या गटात पाकिस्तान व श्रीलंकेकडून त्यांना पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेतील आव्हान संपले होते. त्यातच विराट कोहलीला गवसलेल्या फॉर्ममुळे संघाला दिलासा मिळाला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ठिकाण – बिंद्रा स्टेडयम, मोहाली
वेळ – संध्याकाळी 7-30 पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस नेटवर्क
मात्र, संघाला सलामीचा तसेच चौथ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजीचा प्रश्न कायम राहिला आहे. तसेच गोलंदाजांनाही फारसे यश लाभलेले नव्हते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत या सगळ्या चुका दुरुस्त करण्याची नामी संधी भारतीय संघाला लाभली आहे. त्यातच महंमद शमी करोनामुळे या मालिकेत खेळत नसल्याने संघाला मोठा धक्का बसला होता.
#TeamIndia had their first training session ahead of the #INDvAUS series at the IS Bindra Stadium, Mohali, yesterday.
Snapshots from the same 📸📸 pic.twitter.com/h2g0v85ArH
— BCCI (@BCCI) September 19, 2022
मात्र, संघात परतलेल्या जसप्रीत बुमराहमुळे थोडा दिलासा मिळाला आहे. भारतीय संघाला सातत्याने भक्कम सलामी मिळालेली नाही. त्यातच कोहलीने सलानीला फलंदाजी करत आपले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक साकार केल्यावरही कर्णधार रोहित शर्माने लोकेश राहुलच आपल्यासह डावाची सुरुवात करेल, असे सांगितल्यामुळे कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पंड्या हे मधल्या फळीत कशी फलंदाजी करतात यावर भारताचे अव्हान अवलंबून राहणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत व दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला खेळवावे लागले तर पंतचेच पारडे जड राहणार आहे. गोलंदाजीत बुमराहसह भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल व हर्षल पटेल यांच्यावर गोलंदाजीचा भार राहणार आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही फारसा बलाढ्य वाटत नाही. मिशेल मार्श व मार्कस स्टोनिस यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्याने त्यांचीही मदार कर्णधार अरन फिंच, सिन अबॉट, कॅमेरून ग्रीनसह नवोदितांवर राहणार आहे. हा सामनाच नव्हे तर या संपूर्ण मालिकेत भारतीय संघ चुका सुधारून विजयी झाला तर आगामी विश्वकरंडक स्पर्धेची तयारी यशस्वी होत आहे असे दिसेल.
राहुलवर लक्ष केंद्रित
विराट कोहलीने सलामीला येत शतकी दुष्काळ संपवला असला तरीही लोकेश राहुलच सलामीला माझ्यासह फलंदाजी करेल, असे मत कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे. त्यामुळे ही मालिका राहुलसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यंदाच्या मोसमात आयपीएल स्पर्धेचा अपवाद वगळता राहुलची कामगिरी फारशी सरस झालेली नाही. मात्र, विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने संघातील स्थान कायम राखण्यासाठी त्याला या मालिकेत जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.