#INDvAUS 1st T20 : थरार…! अखेरच्या चेंडूवर षटकार, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 2 विकेटने विजय

India vs Australia 1st T20 Cricket Match Result : भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर या विजयामुळे चाहत्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना रविवारी (26 नोव्हेंबर) तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
Suryakumar Yadav helps India script a stunning run-chase in a humdinger in Vizag 🙌#INDvAUS | 📝: https://t.co/H3lWoA9sUm pic.twitter.com/yo1tBUd5lw
— ICC (@ICC) November 23, 2023
भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात तीन विकेट गमावत 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 19.5 षटकांत आठ विकेट गमावत 209 धावा करत सामना जिंकला. रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण शॉन अॅबॉटचा चेंडू नो-बॉल झाला. अशा स्थितीत रिंकूच्या खात्यात सहा धावा जमा झाल्या नाहीत. भारताकडून सूर्यकुमारने 42 चेंडूत 80 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि चार षटकार मारले. इशान किशनने 39 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि पाच षटकार मारले.
शेवटच्या षटकाचा थरार
भारताने 19 षटकात 5 विकेट गमावत 202 धावा केल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी सहा चेंडूत सात धावा करायच्या होत्या. रिंकू सिंग आणि अक्षर पटेल क्रीजवर होते. सीन अॅबॉटच्या पहिल्याच चेंडूवर रिंकूने चौकार ठोकला. यानंतर पाच चेंडूत तीन धावा हव्या होत्या. पुढच्याच चेंडूवर रिंकूने एक धाव घेतली.
यानंतर अक्षर पटेल तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेला रवी बिश्नोई चौथ्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. भारताला दोन चेंडूंवर दोन धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर रिंकू सिंगने लेग साईडवर शॉट खेळून धाव घेतली. एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावण्याच्या प्रयत्नात अर्शदीप सिंग धावबाद झाला.
शेवटच्या चेंडूवर एक धावेची गरज होती. रिंकू स्ट्राईकवर होता. तो आऊट झाला असता किंवा धावा करू शकला नसता तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता, पण तसे झाले नाही. सीन अॅबॉटच्या चेंडूवर रिंकूने षटकार ठोकला. दुर्दैवाने त्या 6 धावा रिंकूच्या खात्यात जमा झाल्या नाही कारण अॅबॉटचा पाय क्रीजच्या बाहेर होता आणि पंचांनी त्याला नो-बॉल म्हटले होते. अशा परिस्थितीत भारताच्या खात्यात षटकार ऐवजी एक धाव जमा झाली आणि टीम इंडियाने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
तत्पूर्वी, भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं जोश इंग्लिसच्या वादळी शतकी आणि स्टीव स्मिथ याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने शानदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूत 110 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि आठ षटकार मारले.
इंग्लिसने 220.00 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारीही केली. स्मिथने 41 चेंडूत 8 चौकारासह 52 धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट 13 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद सात धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत प्रसिध कृष्णा (4 षटकात 50 धावा) आणि रवी बिश्नोई यांनी (4 षटकात 54 धावा) प्रत्येकी एक विकेट घेतली. अक्षर पटेल (4 षटकात 32), मुकेश कुमार (4 षटकात 29) आणि अर्शदीप सिंग (4 षटकात 41) यांना विकेट घेण्यात अपयश आले.





