भारतात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत साफ अपयशी ठरलेला सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भरात आला. देर आए दुरुस्त आए असे म्हणतात पण सूर्याला भरात येण्यास अंमळ (थोडासा) उशीरच झाला नव्हे का. कामगिरी मोठ्या व्यासपीठावर झाली तर त्याचे कौतुक जास्त होते गल्लीबोळात झाली तर त्याचे महत्वच राहात नाही.
विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर लगेचच चौथ्याच दिवशी भारतीय संघ मायदेशातच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज बनला. दोन्ही संघात विश्वकरंडक खेळलेले काही खेळाडू वगळले तर बाकी फारसे अनुभवी खेळाडू नसल्याने तसे मालिकेतून हाशील काहीच होणार नाही केवळ नवोदितांना थोडाफार किंवा फारच थोडा अनुभव मिळणार आहे.
संघाचे कर्णधारपद दुखापतीने त्रस्त असलेल्या हार्दिक पंड्या याच्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने 42 चेंडूत 80 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, यातून एक स्पष्ट होते की, हा खेळाडू कसोटी तरच नाहीच परंतू एकदिवसीय सामन्यांसाठीही दर्जाचा नाही. त्याने केवळ टी-20 खेळावे हे उत्तम.
त्याच्याकडे ना पुस्तकी फटके (कॉपीबुक क्रिकेट) आहेत. ना तंत्र. केवळ बॅट फिरवणे ही एकच कला त्याला अवगत आहे व ही कला ज्याला कळते तो टी-20 मध्ये सर्वात मोठा कलाकार मानला जातो. नावात सूर्य असूनही संपूर्ण विश्वकरंडक स्पर्धेत त्याचा एकाही सामन्यात उदय झाला नाही. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी करणे गरजेचे होते ती केली नाही व खरेतर त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात मात्र त्याचा उदय झाला परंतू त्यानेच सोपा केलेला सामना आततायी फटका मारत पुन्हा कठिण बनवला होता. नशीब रिंकू सिंगने डोके शांत ठेवत फलंदाजी केली व भारतीय संघाचा विजय साकार केला अन्यथा निसटता पराभव होण्याचीच चिन्हे जास्त दिसत होती. असो, त्याच्या कामगिरीवर जास्त बोलण्यापेक्षा निवड समितीने आता तरी सूर्यकुमार नक्की कोणत्या प्रकारच्या क्रिकेटसाठी बनला आहे हे ओळखावे व त्याला त्याच व्यासपीठावर खेळवावे. विनाकारण केवळ लाडका म्हणून सूर्यकुमारमुळे एकदिवसीय संघात फीट बसेल अशा एखाद्या चांगल्या खेळाडूची जागा वाया घालवू नये.