नगर – यंदा पावसाने मुक्काम वाढवल्याने थंडीची चाहूल जरा उशिरा लागली. काल परवा पासून धुकं पडायला लागले आणि वातावरणात बदल होऊन थंडीचा जोर धरला. हिवाळ्यात ड्राय फू,टला उत्तम मागणी असते. सध्या शहरात ड्रायफ्रूट्स विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात सुकामेवा विक्रीसाठी दाखल झाला असून केवळ नोकरवर्गाकडूनच ड्राययफ्रूट्सच्या मागणीत वाढ झाली आहे.
शहरात थंडीची चाहूल लागताच या आरोग्यदायी ऋतूचा फायदा व्हावा, यासाठी सुकामेव्याला मागणी वाढत असते. शहरातील चितळे रोड व सावेडी या भागात ड्रायफ्रूटची दुकाने लागली असून शहरातील काही भागातील रस्त्यावर सुका मेवाची दुकाने देखील थाटण्यात आली. या दुकानांमध्ये मालाची आवक सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी पावसाचा परिणाम ड्रायफ्रूटच्या आवकेवर झाला असला तरी दरामध्ये पिस्ता वगळता अन्य सुकामेव्याच्या दरावर फारसा परिणाम झालेला नाही.
थंडीच्या ऋतूत सुकामेव्यामुळे शरीरात उष्णता वाढविण्याबरोबर वाढीसाठी आवश्यक असणारी प्रथिने, स्निग्ध, विविध जीवनसत्वे पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य होत असते. याद्वारे शरीराची झीज भरून काढण्यासाठी उपयुक्त पोटॅशियम, मीठ, कॅल्शियम आदी घटक द्रव्यांसाठी हिवाळ्यात सुकामेव्याचे सेवन केले जाते. काजू, बदाम, गोडंबी, मनुका, खारीक, खोबरे या पदार्थांना हिवाळ्यात विशेष मागणी असते. सध्या बाजारात मंदीचे सावट आहे, तरीही नोकरदारवर्गाकडून सुक्यामेव्याच्या मागणीला जोर आहे, मात्र, अन्य वर्गातून सुका मेवाची मागणी होतांना दिसत नाही.
हिवाळ्यात शरीराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्राहकांकडून सुकामेवाची मागणी होते. ऋतू बदलला की माणसाचा आहार बदलतो. त्यामुळे हिवाळ्यात सुकामेवा शक्तिवर्धक, सौंदर्यवर्धक असल्याने सुकामेवा अधिक प्रमाणात खाल्ला जात असल्याने मागणी वाढते. सुकामेव्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने शाकाहारी व्यक्तिंनी आहारात सुकामेव्याचा समावेश करावा.
डॉ. बापूसाहेब गाडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक