शिस्तभंगाचा ठपका : नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्यांना ठोठावला दंड
महापालिका आयुक्तांचा आक्रमक पवित्रा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी श्रावण हर्डीकर आल्यापासून कार्यालयीन शिस्त बिघडल्याचे आरोप होत होते. मागच्या काही दिवसांमध्ये अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींची आयुक्तांनी गंभीर दखल घेत महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये सहायक आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता राजन पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यासह दहा जणांचा समावेश आहे.
आयुक्त हर्डीकर यांचा प्रशासनावर वचक नसल्याने महापालिकेतील कार्यालयीन शिस्त बिघडल्याचे वारंवार समोर आले. आयुक्त कारवाईसाठी धजावत नसल्याने अधिकारी, कर्मचारी त्यांच्या आदेशालाही जुमानत नाहीत. त्यावरून हर्डीकर यांच्यावर नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही वारंवार टीका केली होती. दरम्यान आयुक्त हर्डीकर यांनी अचानकच आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी कारवाई केली. शहर अभियंता राजन पाटील, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता रामदास तांबे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे या तिघांवर 500 रुपये दंडात्मक कारवाई झाली. तर, नगररचना उपसंचालक राजेंद्र पवार, सहायक आयुक्त स्मिता झगडे, आरोग्य विभागप्रमुख डॉ. अनिल रॉय, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, विजयकुमार काळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यावर 250 रुपये दंडात्मक कारवाई केली.
महापालिकेच्या सारथी प्रणालीवर येणाऱ्या विविध तक्रारींची अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे. परंतु, अनेक विभागप्रमुख व प्रमुख अधिकाऱ्यांनी तक्रारी प्रलंबित ठेवल्याचे आढळून आले. वेळोवेळी सूचना देऊन देखील नगारिकांच्या तक्रारींचे निराकरण केले जात नाही. सारथी प्रणालीवर कचरा, तुंबलेली गटारे, ओव्हरफ्लो झालेले चेंबर अशा तक्रारी नागरिक मोठ्या प्रमाणावर करत असतात. अनेक ठिकाणी भटकी कुत्री फिरत असतात. त्याविषयी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही नागरिकांना दिलासा मिळत नाही. तसेच पाणी पुरवठ्याबाबतीतही अनेक तक्रारी असतात.
अनेक ठिकाणी जलवाहिनीला छोट-मोठे लीकेज असतात. त्यामुळे नागरिकांना वेळेत व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. याबाबतही सारथी प्रणालीवर अनेक तक्रारींचा महापूर असतो. मात्र या तक्रारी गांभीर्याने सोडविण्याकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा आयुक्तांना निवेदने दिली होती. तसेच नगरसेवकांनीही वारंवार महापालिकेच्या महासभेत यावरून प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली आहे. तसेच आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याच्या टीकाही झाल्या. त्यामुळे आयुक्तांनी गुरुवारी अचानक महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
सारथी प्रणालीवरील तसेच इतर विविध तक्रारी प्रलंबित ठेवल्याने ही बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी असल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवला. त्यानुसार दहा बड्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. तसेच यापुढे नागरिकांच्या तक्रारींची योग्य वेळी दखल घेतली नाही तर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.