श्रीनगर – भारतीय लष्कराने गुरूवारी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) जवळ घुसखोरीचा डाव उधळून लावत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ती घटना जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात घडली.
एलओसीलगत तैनात असणाऱ्या लष्करी जवानांनी घुसखोरांच्या संशयास्पद हालचाली हेरल्या. घुसखोरांनी भारतीय हद्दीत शिरकाव करू नये यासाठी जवानांनी गोळीबार केला. त्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले.
त्यातील एक जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे कागदपत्रांवरून तातडीने स्पष्ट झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा आढळला. त्यामध्ये पाच रायफल, सात पिस्तुल आणि ग्रेनेडचा समावेश आहे.
याआधी चार दिवसांपूर्वीच लष्कराने उरी क्षेत्रात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडला होता. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील स्वतंत्र चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. शोपियॉं जिल्ह्यात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवान तिथे पोहचले.
त्यावेळी जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला. त्यामुळे जम्मू-काश्मीरात एका दिवसात चार दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले.