उंब्रज – येथील मुख्य बाजारपेठेतील कन्या विद्यालयानजीक असणाऱ्या जुन्या गोडाउन शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने या जागेला सध्या डंपिंग ग्राऊंडचे रुप आले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील ग्रामपंचायतीचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
उंब्रज हे कराड तालुक्यातील राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. देशात सर्वत्र स्वच्छतेचे वारे वाहत असताना उंब्रज या स्वच्छता मोहिमेपासून कोसो दूर असल्याचेच दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक गावे शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी होऊन मोठमोठी बक्षिसे मिळवत आहेत. परंतु उंब्रजमधील लोक गावबंधकीतच अडकून पडलेली आहेत. त्याचा परिणाम गावच्या विकासाकडे होत आहे. एकेकाळी मोठी समजल्या जाणाऱ्या उंब्रज बाजारपेठेचे तीनतेरा वाजले आहेत. फक्त मतांपुरते पुढे येणारे नेतेमंडळी गाव विकासावेळी कोठे गायब होतात? असा प्रश्न आता सामान्य जनता उपस्थित करू लागली आहे.
कराड, चाफळ व तारळे विभागाचा मध्यबिंदू म्हणूनही उंब्रजला पाहिले जाते. येथे असणाऱ्या शासकीय कार्यालये व शैक्षणिकसह इतर सुविधांमुळे चाफळ तारळे, चोरे विभागासह कराड तालुक्यातील आसपासच्या गावातील लोकांची येथे सतत रेलचेल असते. तसेच येथील बाजारपेठही मोठी असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतात.
मुख्य बाजारपेठेत कन्या विद्यालय आहे. उंब्रजसह परिसरातील अनेक गावातील मुली येथे शिक्षणासाठी येत असतात. या विद्यालयानजीक असणाऱ्या जुन्या गोडाउन शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. अनेकजण कचरा (विषेशतः शिल्लक राहिलेला भाजीपाला) गोळा करून येथे टाकतात. त्यामुळे या जागेला सध्या डंपिंग ग्राऊंडचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या परिसरात असणाऱ्या रहिवाशांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बाजारपेठेतून येता-जाता कचऱ्याचे विदारक चित्र दिसते.
सतत पडणाऱ्या पावसामुळे हा कचरा भिजला जात असून या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाकाला रूमाल लावूनच येथून प्रवास करावा लागतो. कन्याशाळेपर्यंत ही दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे शिक्षक व विद्यार्थिनींना त्याचा त्रास होत आहे. तसेच या कचऱ्या सतत कुत्र्यांचा वावर असल्याने येथून जाताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. सध्या सगळे नेतेमंडळी विधानसभेच्या तयारीत गुंतले असून त्यांचे स्वत:च्या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट कोण व कधी लावणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
गोडाउनच्या पाठीमागे जे व्यावसायिक अथवा नागरिक कचरा टाकत आहेत. त्यांच्यावर करडी नजर ठेवून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कचरा उचलण्याबाबत तात्काळ सूचना करणार आहे. त्यांच्याकडून कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवरही कारवाई केली जाईल.
लता कांबळे , सरपंच