वाठार – गेले तीन दिवसांपासून रेठरे बुद्रुकसह कृष्णा काठ परिसरातील पूरपरिस्थिती ओसरायला गुरूवारी सुरवात झाली. येथील रेठरे पुलावरील पुराचे पाणी कमी होत आहे. या भयानक महापुरामुळे नागरिकांचे वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महापुराच्या वाहत्या पाण्यामुळे येथील रेठरे पुलाचे संरक्षक लोखंडी अँगल तुटून वाहून गेले आहेत.
रेठरे बुद्रुक येथे तेरा वर्षांनंतर महापूर आला. महापुराच्या पाण्याने गावाला वेढा दिला होता. येथील कित्येक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पुलावरील लोखंडी अँगल तुटून वाहून गेले आहेत. त्यामुळे या पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. पूर कालावधीत पुलावरून पाणी वाहत असताना या पुलाचा मधला भाग तुटून वाहून गेला. पूल पडल्याची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत होती. त्यामुळे रेठरेकरांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखा प्रकार होत होता. त्यामुळे ग्रामस्थामध्ये भितीदायक वातावरण पसरले होते.
पुराचे पुलावरील पाणी कमी झाल्यामुळे सत्य परिस्थिती समोर आली असून पुलाचे वरचे फक्त लोखंडी अँगलाच तुटलेले लक्षात आले. हे अँगल तुटल्यामुळे पुलावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. पूर ओसरताच प्रथम पुलाची डागडुजी करणे आवश्यक आहे. पूर ओसरत असला तरी गावातील मुख्य चौकातील बसस्थानक परिसरात अद्याप पुराचे पाणी ओसरलेले नाही. गत दोन दिवसांच्या तुलनेत पूर ओसरत असल्याचे चित्र पाहून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. पुराचे पाणी कमी होईल तसे गावातून इतरत्र स्थलांतरित लोक घराच्या दिशेने जात असल्याचे पहावयास मिळत आहे.