सणबूर – गेल्या तेरा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे ढेबेवाडी विभागातले अनेक गावातील पूल पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी शेती वाहून पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पाटण घाटात दरडी कोसळण्या बरोबरच घरांच्या पडझडीच्या शेकडो घटना घडल्या आहेत. पूल पाण्याखाली गेल्याने सुमारे 50 हून अधिक गावे संपर्कहीन आहेत. मात्र तेरा दिवस पाण्याखाली असल्याने काळगाव-भरेवाडी, मंद्रुळकोळे व भांबुचीवाडी येथील फरशीपूल वाहून गेल्याने ग्रामस्थांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
वांग नदीला पूर आल्याने ढेबेवाडी विभागातील मालदन, मंद्रुळकोळे, बाचोली, काढणे, खळे, कुठरे, काळगाव, धामणी, पवारवाडी येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सुमारे पन्नासवर गावांचा आणि वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. बुधवारी दुपारपासूनच पावसाने झोडपायला सुरूवात केली होती. जसजसा वेळ जाईल तसे पावसाचे प्रमाणही वाढायला लागल्याने ग्रामस्थांमधून भिती व्यक्त होत आहे. कोणत्याही सुविधा लोकांपर्यंत पोहचविणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच पाण्याच्या दाबामुळे फरशीपूलही वाहून जाऊ लागल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. बुधवारी दुपारी एक वाजता वांग नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने मं.कोळे ते येणके असे वांग नदीवरील कमी उंचीचे सहा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली.