अद्यापही समाज विकासापासून कोसो दूर
तुटपुंज्या पैशांत करावी लागतेय गुजराण
अंकुश भूमकर
लोणी-धामणी (वार्ताहर) – घिसाडी म्हंटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते लोखंडी वस्तू बनविणारे, शेतीची लोखंडी अवजारे बनविणे आणि शेतीला लागणारी अनेक प्रकारची हत्यारे बनविणारा समाज. हाच समाज अद्यापही विकासापासून कोसो दूर राहिला आहे. त्यामुळे हा समाज गावोगावी भटकंती करुन आपला उदरनिर्वाह करत असताना दिसून येत आहे.
धामणी (ता आंबेगाव) येथे तीन-चार दिवसांपासून घिसाडी समाजाची दोन कुटुंबे औरंगाबाद येथून व्यवसायाकरिता स्थाईक झाली आहेत. पूर्वी हा समाज घोडागाडी घेऊन गावोगावी फिरत असत, परंतु बदलत्या काळानुसार समाजाने यांत्रिकीरणाचा थोडा फायदा घेत तिन चाकी रीक्षा गाडीमध्ये आपल्या व्यवसायाशी निगडीत वस्तू घेऊन ते गावोगावी फिरत असतात. फिरतीचा व्यवसाय असल्याने मुलांना शिक्षण घेता येत नाही. कामधंदा आणि उत्पन्नाचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने फिरुन पोट भरावे लागत आहे. पावसाळा असला तरी हाच व्यवसाय करावा लागतो.
दिवसभरलोखंडी अवजारे उदा. खुरपी, कुऱ्हाडी, कोयते, विळे, कुदळी बनविण्यासाठी फिरावे लागत आहेत. दिवसभरात जेमतेम बाराशे ते पंधराशे रूपये धंदा, सर्व खर्च वजा जाता हातात उरतात. ज्या वयात खेळणे, बागडणे परंतू अस रोज एक गाव फिरून पोट भरणं या सगळ्यात त्या बालकांचे निरागस जीवनच पुरं बदलून गेले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज नवीन गावाची भटकंती हे जणू या कुटुंबांचे आयुष्याचे समीकरणच बनले आहे.
हसायच्या, खेळायच्या वयात हाती काम
खेळायचं, हसायचं बागडायचं त्याच वयात या छोट्या निरागस बालकाला आपल्या कुटुंबाच्या कामामध्ये खारीचा वाटा उचलावा लागत आहे. आई-वडील लोखंडावर घाव घालताना लहान बाळही भात्याने हवा घालण्यासाठी मदत करण्यात मागे नसते. हे बघताना परिस्थितीचे भयाण वास्तव डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
ग्रामीण महाराष्ट्रात घिसाडी समाजाच्या या व्यवसायात महिलांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी त्यांना पहाटे चार ते रात्री बारापर्यंत अंगमेहनत करावी लागते. तेव्हा कुठे त्यांना दोनशे रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. दुकानातील विक्री पेक्षा ग्राहक कमी पैसे देतात. महागाई वाढल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होत आहे. तुटपुंज्या पैशात गुजराण करावी लागत आहे.
– सुरेश पवार