जेएनयु हल्ला प्रकरणात दिल्ली पोलिसांची अनोखी भूमिका
नवी दिल्ली – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही बुरखाधारी हल्लेखोरांनी हल्ला करून तेथील विद्यार्थी व शिक्षकांना अमानुष मारहाण केली होती तसेच तेथे त्यांनी बरीच मोडतोड करून दहशतही माजवली होती. या हल्ला प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. काल या हल्ला प्रकरणाला चाळीस दिवस झाले आहेत. तरीही या हल्ला प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाहीं अटक न केल्याने दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तथापी आज दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी एका वाहिनीला सांगितले की आम्ही या प्रकरणात कोणालाही अटक न करता संशयितांच्या विरोधात थेट न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहोत. त्यांच्या अटकेचा विषय आम्ही न्यायालयावर सोपवणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान पोलिसांच्या या अनोख्या भूमिकेवरही आक्षेप घेण्यात आला आहे.
हा हल्ला अभाविपच्या गुंडांनी केला असल्याचा दावा विरोधी संघटनांच्यावतीने करण्यात आला आहे. पण डाव्या विचारांच्या संघटनांच्याच कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र हे आरोपी कोण आहेत त्यांची नावे पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. हल्ला होऊन चाळीस दिवस होऊनही पोलिसांनी अद्याप कोणालाच कशी अटक केली नाही असा सवाल करीत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
पोलिसांनी या हल्ला प्रकरणात तीन एफआयआर दाखल करून 70 जणांची चौकशी केली आहे पण त्यातून त्यांनी अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. मात्र या हल्ल्यात अभाविप कार्यकर्त्यांचाच हात असल्याचा दावा विरोधी संघटनांनी केला असून त्यांनी त्या संबंधात काही व्हिडीओ क्लीपही सोशल मिडीयावर प्रकाशित केल्या आहेत. ही माहिती पोलिसांना पण देण्यात आली आहे पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही असा आरोप डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे. अभाविपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.