कॉंग्रेसने केला जोरदार पलटवार
चंदीगड – कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन पुलवामा हल्ला प्रकरणात भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. या हल्ल्याशी संबंधीत अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत त्याची देशाला उत्तरे हवी आहेत असे सुर्जेवाला म्हणाले.
आम्ही पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करतो. पण पुलवामा हल्ल्याच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल लोकांपुढे खुले करण्यास सरकार अजूनही का घाबरते आहे असा सवाल त्यांनी केला.
हल्ल्याच्या घटनास्थळी 350 किलो आरडीएक्स स्फोटके कशी आली आणि ती कोणी आणली या प्रश्नाचे आजहीं उत्तर मिळालेले नाही. आरडीएक्स स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफ ताफ्याच्या मार्गावर कसे घुसले? आणि हे वाहन सीआरपीएफ जवानांच्या वाहनांना कसे धडकवण्यात आले असा सवाल त्यांनी केला. दहशतवाद्यांना मदत केली म्हणून अटक करण्यात आलेला पोलिस अधिकारी दविंदर सिंग याचा या हल्ल्यात काही हात आहे काय असा सवालही त्यांनी केला.
हा हल्ला झाला त्या दिवशी मोदी जिम कार्बेट मध्ये एका वाहिनीच्या कार्यक्रमासाठी शुटींग करीत होते. हल्ल्यानंतर आठ ते नऊ तास होऊनही पंतप्रधानांना इतक्या भीषण हल्ल्याची माहिती का मिळू शकली नाही, याच्या इतकी मोठी सुरक्षा त्रुटी आणखी काय असू शकते असा सवालही सुर्जेवाला यांनी उपस्थित केला. देशाच्या गृहमंत्र्यांनी देशापुढे येऊन या प्रश्नांची खरी उत्तरे द्यावीत तीच या शहीदांना खरी श्रद्धांजली ठरू शकते असेही ते म्हणाले.