चार वर्षांनी फुलणाऱ्या “आकरा’च्या फुलोऱ्याला औषधी मधामुळे विशेष महत्त्व
महाबळेश्वर – दर चार वर्षांनी फुलणाऱ्या कारवी जातीच्या विविध प्रकारांतील “आकरा’ या वनस्पतीला फुले येऊ लागली असून पांढरट “आकरा’च्या फुलांनी महाबळेश्वरचे वेण्णा तलाव परिसरातील पठार फुलून गेले आहे. या वनस्पतीचे वनस्पती शास्त्रातील नाव “लेपिडोग्याथास कुस्तीडाटा’ असे आहे. या वनस्पतीची फुले पांढऱ्या रंगाची छोटी छोटी असून 20-25 टोकदार पानांच्या झुपक्यावर ती येतात. मधमाशांच्या परागीभवनासाठी व आतील औषधी मधासाठी या प्रकारच्या फुलोऱ्याला विशेष महत्व असते.
कारवी या वनस्पतीच्या विविध वैशिष्ट्यपूर्ण काळात येणाऱ्या फुलांमुळे या वनस्पतींचे प्रामुख्याने चार प्रकार आढळतात. दर सात वर्षांनी फुलणारी कारवी, व्हाईटी या कारवीच्या प्रकारातही दर सात वर्षांनीच फुले येतात. तर आकरा या प्रकारात दर चार वर्षांनी फुले येतात, यातीलच खरवर या प्रकारात दर सोळा वर्षांनी फुले येतात. प्रत्येक हंगामात येणाऱ्या फुलोऱ्याच्या वेळी मधमाश्या त्या त्या फुलांमधून जो मध गोळा करतात त्याला त्या त्या प्रकारचा मध म्हणून संबोधिला जातो.
सध्या आकरा जातीच्या कारवी फुलांचा हंगाम सुरु झाला आहे. या काळात जमा होणारा मध आकराचा मध म्हणून ओळखला जातो. कारवीच्या सर्वच जातीचा मध अत्यंत औषधी असतो.
आकरा जातीच्या कारवीचे वैशिष्ट्यम्हणजे हिची फुले साधारण अर्धा इंच लांब असतात. पांढऱ्या रंगाच्या फुलाची एक पाकळी थोडी लांब तर दुसरी तुलनात्मक कमी लांब असते. फुलाच्या आत परागकण असून तेथेच मध साठलेला असतो. फुलाचा मादक व मोहक वास मधमाशांना आकर्षून घेतो व फुलातील मध गोळा करताना आतील परागकण मधमाशांच्या पायाला चिकटतात. तेथून मध गोळा करून मधमाशी दुसऱ्या फुलात मध गोळा करायला जाते, त्यावेळी हे पराग त्या फुलामध्ये रुजतात. त्यामुळे हा हंगाम या फुलांच्या परागीभवनासाठीही फारच महत्वाचा असतो.
आकरा जातीच्या वनस्पतीचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीची पाने छोटीछोटी पण लांबट टोकदार असतात. अशा सुमारे 25- 30 पानाच्या सुमारे तीन चार इंच लांबीच्या झुबक्यावर ही फुले एक- दोन अशी ठिकठिकाणी येतात. त्यामुळे टोकदार हिरव्या पानांचा झुपका व त्यावरील पांढरी फुले अत्यत सुंदर दिसतात. या वनस्पतींना चार वर्षांतून एकदा फुले येत असल्याकारणाने व त्याचा वापर केवळ मधमाश्यांना मध गोळा करण्यासाठी व त्यांच्या परागीभवनासाठी व्हावा, यासाठी निसर्गतःच या वनस्पतीला संरक्षण दिलेले असते.
या वनस्पतीला फुले येतात त्यावेळी तिची पाने कडक टोकदार बनतात. आपण किंवा अन्य प्राणी त्यास तोंड किंवा हात लावेल त्यावेळी ती काट्यासारखी टोचतात. त्यामुळे या फुलोऱ्याच्या काळात मधमाश्यांव्यतिरिक्त कोणीही त्याच्या जवळ जात नाही. अन्य काळात ही वनस्पती गाई, म्हशी अशा जनावरांना चारा म्हणून अत्यंत उपयोगी असते. डिसेंबरमध्ये सुरु झालेला या वनस्पतीचा फुलोरा साधारण मार्चपर्यत कमी- अधिक प्रमाणात असतो, अशी माहिती महाबळेश्वर मध संचालनालयाचे सेवानिवृत संचालक वसंतराव पाटील यांनी दिली.
गवतासारखी ही वनस्पती रस्त्याच्या कडेला वा जंगलात जमिनीलगत वाढलेली असते. वेली प्रकारात ही वनस्पती मोडते. सध्या महाबळेश्वरच्या पठारावर प्रामुख्याने प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तसेच अन्य जंगल भागात “आकरा’ची फुले मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे हे पठार आकराच्या फुलांमुळे अत्यंत आकर्षक दिसत आहे.