20 वर्षांपासूनची परंपरा कायम
रेडा – शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. पंचवार्षिक निवडणुकीसाठी 20 जागांसाठी 20 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
माजीमंत्री पाटील हे या कारखान्याचे संस्थापक आहेत. स्थापनेपासून कारखान्याची 20 वर्षे निवडणूक बिनविरोध होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होणेसाठी पाटील व इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी परिश्रम घेतले. इंदापूर तहसील कार्यालयात सोमवारी (दि.13) उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यामध्ये अपक्ष उमेदवाराचा एक अर्ज बाद झाला. त्यामुळे 20 जागांसाठी 20 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.
मात्र, दि.28 जानेवारीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने बिनविरोध निवडणुकीची घोषणा करण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
सध्या साखर कारखानदारी अडचणीत असल्याची जाण ठेवून कार्यक्षेत्रातील 46 गावांमधील सभासद व ऊस उत्पादकांनी निवडणूक बिनविरोध करण्याकरिता सहकार्याची भूमिका घेतली.
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ :
हर्षवर्धन शहाजीराव पाटील, राजवर्धन हर्षवर्धन पाटील, प्रतापराव सर्जेराव पाटील, उदयसिंह विलासराव पाटील, प्रकाश शहाजी मोहिते, संजय तुळशीराम बोडके, हरिदास मारुती घोगरे, दादासो उत्तम घोगरे, मच्छिंद्र संताराम वीर, दत्तात्रय रामचंद्र शिर्के, लालासो देविदास पवार, कृष्णाजी दशरथ यादव, बबनराव आनंता देवकर, भागवत भानुदास गोरे, दत्तू यशवंत सवासे, चंद्रकांत रामचंद्र भोसले, संगिता दत्तात्रय पोळ, जबीन कमाल जामदार, कांतीलाल शिवाजी झगडे, विलास रामचंद्र वाघमोडे. बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.