लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये सुरु असणारा मृतदेहांचा सावळा गोंधळ काही केल्या कमी होताना दिसत नाही. रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. दरम्यान, सरकार आणि प्रशासनाकडून मृतदेहांवर पूर्ण प्रोटोकॉलप्रमाणे आणि पूर्ण सन्मानासह अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले जात आहेत. मात्र असे असतानाही एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह हा चक्क कचऱ्याच्या गाडीतून पोलिसांनी नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंड विभागातील महोबा जिल्ह्यात हा संतापजनक प्रकार घडला आहे. खरेला परिसरात राहणारे शेतकरी रामकरण यांना ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. प्रकृती बिघडल्याने त्यांचा मुलगा त्यांना रुग्णालयात घेऊन आला. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. करोनाकाळात संशयास्पद मृत्यू झाल्याने रुग्णालयाने पूर्ण खबरदारी घेतली.
या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी पंचनामा केला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या शेतकऱ्याचा मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून शवविच्छेदनासाठी नेला. या संदर्भातील एक व्हिडीओ समोर आला असून, दोन पोलीस कर्मचारी पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला मृतदेह कचऱ्याच्या गाडीत ठेवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथूनही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये दोन व्यक्ती एक मृतदेह पुलावरून नदीत फेकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ २८ मे रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.