कल्याणी फडके
पुणे – सदैव खेळणारी-बागडणारी, मित्र-मैत्रिणींत रमणारी लहान मुले करोनामुळे जवळपास 15 महिन्यांपासून घरातच आहेत. त्यांचे बालपण चार भिंतींत अडकले आहे. परिणामी, त्यांच्या वर्तणुकीत मोठे बदल दिसत आहेत.
कंटाळा, चिडचिडेपणा वाढण्यासह चिमुकल्यांचा “स्क्रीन टाइम’ वाढल्याचे चित्र आहे. मुलांमधील हे बदल पालकांसाठी “टास्क’ ठरत आहेत. तर, याचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेता सध्याचा वेळ मुलांसाठी गुणात्मकरित्या वापरणे आवश्यक असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मध्यंतरी अनलॉकच्या टप्प्यात मुलांचे सोसायटी, घराजवळ मित्र-मैत्रिणींसह खेळणे होत होते. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही होणारा संसर्ग आणि तिसऱ्या लाटेची भीती यामुळे मुलांचे प्रत्यक्ष खेळणेदेखील बंद झाले. त्यामुळे काहीसा मोकळा श्वास घेणाऱ्या मुलांवर पुन्हा बंधने आली. याचे दुष्परिणाम दिसत असल्याचे निरीक्षण पालकांनी नोंदवले आहे.
“लहान मुले घरीच असल्याने बांधलेपण आले आहे. घरातच राहत असल्याने कोणतीही दिनचर्या पाळली जात नाही. सुरुवातीच्या टप्प्यात पालकांचे “वर्क फ्रॉम होम’ किंवा अन्य कामे, व्यवसाय सुरू नसल्याने पालक मुलांना अधिक वेळ देऊ शकत होते. मात्र, टप्प्याटप्प्य्यांत या बाबी सुरळीत झाल्या.
यामुळे काहीअंशी मुले आणि पालकांचा वेळदेखील कमी झाला आहे. याचा परिणाम सध्या दिसत आहे,’ असे समुपदेशक अस्मिता अस्मिता इनामदार-बारसावडे यांनी सांगितले.
संवाद वाढवा-मोकळेपणाने बोला
“पालक आणि मुले 24 तास एकमेकांसमोर आहेत. त्यामुळे आता थोड्या मोठ्या मुलांना पालकांचा विविध बाबींमध्ये हस्तक्षेप वाटू लागला आहे. त्यामुळे नात्यात अडथळे निर्माण होत आहेत. दुसऱ्या लाटेची भीती एकदम वाढल्याने मुलांवरील बंधनेही वाढली.
या सगळ्यांत मुलांची चिडचिड आणि आळस वाढला आहे. आरोग्यावर परिणाम झाला आहे. यावर घरांत संवाद वाढवणे, मोकळेपणाने बोलणे अधिक महत्त्वाचे आहे,’ असे समुपदेशक अस्मिता इनामदार-बारसावडे यांनी नमूद केले.
तज्ज्ञ म्हणतात, दीर्घकालीन परिणाम लक्षात घ्या
कोणतीही व्यक्ती समाजप्रिय असते. पण सध्या मुलांचे खेळणे, मित्रांसोबत बोलणे, बाहेर जाणे बंद असल्याने मुलांच्या वर्तणूकीत साहजिक परिणाम होत आहे. त्यांचा अपेक्षित विकास होत नसून, त्यामध्ये अडथळे येत आहेत. प्रामुख्याने सगळ्यांच बाबी ऑनलाइन होत असल्याने लहान मुलांवर अधिक परिणाम दिसत आहेत.
यामुळे डोळे आणि मनावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. एकमेकांशी भेटी बंद झाल्याने याचे कालांतराने परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
सध्या घरातील वातावरण आनंदी ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना वेळ देणे, घरातील खेळ खेळणे आदी बाबींचे पालन आवश्यक आहे. पालकांनी मुलांच्या शंका, प्रश्नांवर वैज्ञानिक माहितीसह उत्तरे देणे आवश्यक आहे.
– डॉ. नितिन अभिवंत, मानसोपचार विभाग प्रमुख, ससून रुग्णालय
घरातच असल्याने आमच्या मुलीची चिडचिड थोडी वाढली आहे. ऑनलाइन शाळा, क्लास, गेम्समुळे मोबाइलचा वापरही वाढला. एकटेच खेळणे किंवा टीव्ही पाहणे या गोष्टी वाढल्या आहेत.
सवयी बिघडल्या आहेत. एकाग्रता हरवली असून, अभ्यास करवून घ्यावा लागतो. घराबाहेर नकळत शिकणाऱ्या गोष्टी, अनौपचारिक शिक्षण सध्या नाही. त्यामुळे मुलांचे लहानपण हरवल्याची परिस्थिती आहे.
– राधिका सुधीर इनामदार, पालक