आरटीओ कार्यालयाचा “पराक्रम’ : वाहन मालकाच्या परवानगी विनाच वाहन हस्तांतरित
पिंपरी – आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लागेल, या आशेने त्यांनी मोठ्या कष्टाने एक टेम्पो घेतला. परंतु, त्यांच्या परस्परच तो टेम्पो त्रयस्थ व्यक्तीस विकण्यात आला. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे मूळ मालकाच्या परवानगीविनाच पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाने परस्परच त्या टेम्पोचे हस्तांतर करण्याचा पराक्रम केला आहे.
भावानेच केलेल्या फसवणुकीला एजंट आणि कर्मचाऱ्यांनी साथ दिली. आज टेम्पोचा मूळ मालक आपला टेम्पो परत मिळविण्यासाठी आपली लहान मुलगी आणि दिव्यांग पत्नी यांना घेऊन आरटीओ कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.आठ महिन्यापासून हे कुटुंब राजगुरुनगर येथून पिंपरी- चिंचवड आरटीओ कार्यालयात येत आहे.
सचिन काशिनाथ गव्हाणे असे टेम्पोच्या मूळ मालकाचे नाव असून ते राजगुरुनगर येथे आपली दिव्यांग पत्नी व लहान मुलीसमवेत राहतात. सचिन यांनी त्यांचा भाऊ समीर गव्हाणे याला भाडेतत्वावर टेम्पो चालवायला दिला होता. मात्र, काही दिवसानंतर त्यांचा भाऊ त्यांना भाडे देत नव्हता. तेव्हा त्यांनी माझा टेंम्पो मला परत कर, अशी मागणी केली. मात्र, समीर याने परस्पर हा टेम्पो दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचे सचिन यांच्या निर्दशनास आले.
तेव्हा हा व्यवहार कसा झाला. याबाबत त्यांनी आरटीओ कार्यालयाकडून माहिती अधिकाराखाली माहिती घेतली. तेव्हा आरटीओमधील लिपिक व एजंट यांच्या संगनमताने हा व्यवहार झाल्याचे समोर आले. यानंतर सचिन यांनी पोलिसात धाव घेत न्याय मागितला. मात्र तुमची ही घरगुती बाब असल्याचे सांगत सचिन यांना पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर, आरटीओ अधिकाऱ्यांनीही सचिन यांची तक्रार गांभिर्याने घेतली नाही. यामुळे हताश झालेल्या सचिन यांनी जर न्याय मिळाला नाही. तर, आपण आत्महत्या करणार असल्याचे बोलून दाखवले आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांना दीड हजार ट्वीट
आपले वाहन बेकायदा व परस्पर विकल्याने न्याय मिळत नसल्याने सचिन यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सुमारे दीड हजार ट्वीट केले. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा याबाबत सचिन गव्हाणे यांनी ट्वीट केले. मात्र दोघांकडूनही अद्याप या प्रकरणाची दखल घेतली गेली नसल्याचे सचिन यांचे म्हणणे आहे.पोलिसांकडूनही न्याय नाही
वाहनाचे हस्तांतरण चुकीच्या पद्धतीने आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे झालेले आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर सचिन यांनी वाहनाचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी खेड, मंचर, घोडेगाव आणि भोसरी एमआयडीसी या चार ठिकाणच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र कोणत्याही पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही.