मुंबई – अंधेरी पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचलेली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज भाजपने देखील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जाहीर केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. भाजपने काळजावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला असल्याचा टोला यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
भाजपाने आडमुठेपणा केला अशी टीकाही यावेळी पेडणेकर यांनी केली. आजच पत्र का दिलं ? एक महिनाआधी का दिलं नाही ? हा संपूर्ण वाद टाळता आला असता. ऋतुजा लटके यांना मानसिक त्रास झाला तो कसा भरुन काढणार ? असे अनेक सवालही पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केले. तसेच आमचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार याचा आनंद असल्याचही पेडणेकर यावेळी म्हणाल्या.
मुरजी पटेल हे खोटं प्रमाणपत्र दिल्याने बाद झालेले उमेदवार होते. त्यामुळे सर्वांना ती कल्पना आली. हे उशिरा आलेलं शहाणपण आहे अशी टोलेबाजी देखील पेडणेकर यांनी यावेळी केली. तत्पूर्वी राज ठाकरे यांची भाजप नेत्याने घेतलेली भेट आणि त्यानंतर पोटनिवडणुकीचा झालेला निर्णय यामुळे मनसे भाजपच्या युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.