मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतून आज भाजपाने माघार घेत असल्याचे जाहीर केले. भाजपाच्या या निर्णयानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. हा निर्णय आधीच झाला असता, राजकीय चिखलफेक टाळता आली असती, असे ते म्हणाले.
संदीप देशपांडे यांनी,“काल राज ठाकरेंनी पत्र लिहीले होते. भाजपाने त्यावर गांभीर्याने विचार करून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुळात गेल्या एक महिन्यापासून राज्यात जी चिखलफेक सुरूहोती, ती टाळता आली असती. मात्र, आता शेवट गोड होतोय याचा आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया मनसे संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बीसीसीआय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली ही सेटलमेंट आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरही संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ”विक्रम वेताळच्या जशा कथा असायच्या तशा शरद पवार यांच्या कथा महाराष्ट्राच्या राजकारणात चालतात. हीसुद्धा त्यापैकीच एखादी कथा असावी”, असे ते म्हणाले.